क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो आयएसएल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी वास्कोतील टिळक मैदानावर एससी ईस्ट बंगाल आणि बेंगलोर एफसी संघात लढत होईल. बाद फेरीच्या आशा राखण्यासाठी एससी ईस्ट बंगालला विजय अनिवार्य आहे. सध्या बेंगलोरचे 14 सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी व पाच पराभवाने 15 तर एससी ईस्ट बंगालचे 14 सामन्यांतून दोन विजय, सात बरोबरी व पाच पराभवाने 13 गुण झाले आहेत.
स्वतःची कामगिरी उत्तम झाली आणि स्पर्धेतील इतर निकाल अनुकूल लागले तर त्यांचा संघ बाद फेरी गाठू शकतो. संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश येत असल्याने ईस्ट बंगालच्या गुणांवर परिणाम झाला आहे. गेल्या चार सामन्यांत त्यांना विजय मिळविता आलेला नाही. मोसमात आतापर्यंत त्यांना केवळ 12 गोल करता आले आहेत. सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत त्यांचे शेवटून दुसरे स्थान आहे.
एससी ईस्ट बंगाल चौथ्या स्थानावरील संघापासून आठ गुणांनी मागे आहे. निकालावरूनच आमची वाटचाल ठरेल, असे त्यांचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर म्हणाले. आम्ही अनुकूल निकाल मिळविण्यासाठीच मैदानावर उतरतो. बाद फेरीची कागदावर संधी असेपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू. सध्या हे शक्य आहे, पण शेवटी निकालांवर ते अवलंबवून असेल, असे फाऊलर म्हणाले.
बेंगलोर एफसी संघाचीही कामगिरी खालावली आहे. गेल्या आठ सामन्यांत त्यांना विजय मिळालेला नाही व यात त्यांना पाच पराभव पत्करावे लागले आहेत. गोल पत्करणे ही बेंगलोर एफसीसाठी समस्या ठरली आहे. गेल्या 11 सामन्यांत त्यांना क्लीन शीट राखता आलेली नाही. त्यांना 19 गोल पत्करावे लागले असून केवळ ओडिशा एफसी व केरळ ब्लास्टर्स यांच्याविरूद्ध यापेक्षा जास्त गोल झाले आहेत.
बेंगलोर एफसीने विजयाच्या स्थितीत असताना 9 गुण गमावले आहेत. मागील सामन्यहत हैदराबाद एफसीविरूद्ध त्यांना जिंकण्याची संधी होती. पण दोन गोलांच्या आघाडीनंतरही त्यांना 2-2 अशी बरोबरी साधावी लागली. आता एरीक पार्तालू आणि जुआनन हे दोघे खेळू शकणार नसल्यामुळे बेंगलोरसमोरील आव्हान खडतर झालेले असेल. आमचे अलिकडेचे निकाल बघता संघातील वातावरण निराशेचे आहे, पण आमचा संघ अजुनही बाद फेरीच्या शर्यतीत असल्यामुळे माझा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे बेंगलोरचे हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा म्हणाले.
गुणतक्ता पाहिला तर फार फरक नसल्याचे दिसेल. केवळ एक विजय मिळाला तर तुम्ही आगेकूच करता. त्यामुळे आम्ही खरोखरच प्रेरीत झालो आहोत. त्यामे अनुकूल निकाल साध्य करण्यास आम्हाला प्रेरणा मिळते. आम्हाल कसून प्रयत्न करावे लागतील आणि बाद फेरी गाठावी लागेल, असे नौशाद मुसा म्हणाले.