देशात दिवसभरात 1 लाख 45 हजार नवे रुग्ण – जवळपास 800 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेने संपूर्ण देशाला जेरीस आणले असून, प्रचंड वेगाने संक्रमण होत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता छत्तिसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही नव्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. गर्दी आणि कोरोना नियमांबद्दलच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 45 हजार 384 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत 77 हजार 567 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकडय़ात मोठी वाढ झाली आहे. 24 तासांत 794 म्हणजेच जवळपास 800 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 इतकी झाली आहे. या चढय़ा आकडेवारीतून देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेची तीव्रता भयंकर होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसातच 10 लाखापेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 68 हजार 436 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाचे 1 कोटी 32 लाख 05 हजार 926 रुग्ण झाले असून एकूण सक्रिय रुग्णसंख्या 10 लाख 46 हजार 631 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात काही दिवसांपासून 50 हजारापेक्षा अधिक रुग्णांची दररोज नोंद होत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 8,521 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच छत्तिसगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आता दिवसाला 10 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडू लागल्याने वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. देशात सध्या मृत्यूदर 1.27 तर रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्के आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे.
लसीकरणाला गती
दरम्यान, देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जवळपास 10 कोटी डोस देण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील लोकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत देशात 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 11 लाख 73 हजार 219 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 25 कोटी 52 लाख 14 हजार 803 चाचण्या घेण्यात आल्या.