अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 7 ऑगस्ट 2021, सकाळी 10.00
●संख्या वाढण्याचे प्रमाण गुलदस्त्यातच ●छुप्या पद्धतीने बंधने कडक करण्याच्या नादात प्रशासन ●कोरोना मुक्तीचे प्रमाण कमी ●कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे झाले काय?
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील जनतेला लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनला जनता वैतागली आहे. लॉकडाऊन करायचा की नाही हे पॉझिटिव्ह रेटवर ठरवले जाते. असे असताना गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात चढ-उतार होत आहे. दि.6 रोजी दिवसभरात 909 जण पॉझिटिव्ह आढळून आले. ही संख्या अचानक का वाढली याचे कारण गुलदस्त्यात आहे. कोरोना मुक्तीचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हा प्रशासन छुप्या पध्दतीने पुन्हा निर्बंध कडक करण्याच्या विचारात आहे.
पाच दिवसात दोनदा हजारांसमीप बाधित
राज्यात सर्व जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत असताना नेमका शुक्रवारी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 909 एवढा दाखवण्यात आला आहे. दि.31 रोजी 11,577 तपासण्या झाल्या होत्या, त्यात 675 बाधित आढळून आले होते. 5.8 एवढा पॉझिटिव्हिटी रेट होता. दि.01 रोजी 8901 तपासण्या केल्या होत्या. त्यात 644 पॉझिटिव्ह आले होते. 7.23 एवढा पॉझिटिव्हिटी रेट होता. दि. 02 रोजी 7110 टेस्ट झाल्या होत्या त्यापैकी 622 बाधित आढळून आले तर 8.7 पॉझिटिव्हिटी रेट होता. दि. 3 रोजी 12357 तपासण्या झाल्या. त्यात 618 पॉझिटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्हिटी रेट 5 होता. दि. 04 रोजी 10707 तपासण्या झाल्या होत्या. त्यामध्ये 993 बाधित आढळून आले तर 9.27 पॉझिटिव्हिटी रेट होता. दि.5 रोजी 9839 तपासणी करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 566 जण पॉझिटिव्ह आले होते तर 5.75 पॉझिटिव्हिटी रेट होता. दि.6 रोजी दिवसभरात 12201 तपासणी करण्यात आल्या होत्या. 909 जण पॉझिटिव्ह आले असून 7.44 एवढा पॉझिटिव्हिटी रेट आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे झाले काय?
सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेले सातारा जिल्हावासीय लॉकडाऊनचे कडक नियम नकोत म्हणून मागे लागलेत. त्यात बाधित आढळून येऊ नये, म्हणून प्रत्येकजण काळजी घेत आहे. तरीही बाधा झाल्याचे उशिरा समजत असल्याने गोंधळ अजून उडत आहे. या करिता जिल्हाप्रशासन बाधित कोणाच्या संपर्कात होता हे शोधून काढत होते. ती पध्दत बंद झाली आहे. परंतु प्रशासन आकडा वाढत असल्याचे कारण देऊन छुप्या पध्दतीने कडक निर्बध लादू पहात आहे.
सर्वसामान्यांचे हाल
लॉकडाऊन अन् कोरोना जरी गरीब, श्रीमंत पहात नसला तरीही सर्वसामान्यांना याचे चांगलेच चटके बसत आहेत. अनेकांचे रोजगार गेलेत, अनेकांच्या घरातले कर्ते लोक गेलेत. अनेक जण निराधार झालेत. याचे दुष्परिणाम जास्तकरून सर्वसामान्याना बसले आहेत.
शनिवारपर्यंत एकूण नमूने – 14,69,779 एकूण बाधित – 2,23,125 घरी सोडलेले – 2,09,551 मृत्यू – 5412 उपचारार्थ रुग्ण-10457