रांजणवाडीतील प्रकार, एका महिलेसह सुमारे 125 नागरिकांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
रांजणवाडी (ता. महाबळेश्वर) येथील कोरोना रूग्णांना उपचारासाठी घेवुन जाण्यासाठी आलेल्या पालिका व वैद्यकिय पथकावर रूग्णांचे नातेवाईक व इतरांनी दगडफेक करून हल्ला केला. या हल्यात एका वाहनाचे नुकसान झाले तर घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे पालिका अधिकारी, डॉक्टर व इतरांचे जीव वाचले. या प्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर तसेच 100 ते 125 अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
शहरापासुन दोन किलोमीटर अंतरावर रांजणवाडी हा वसाहत आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम एका लहान मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या वसाहतीमधील दोन पालिका कर्मचाऱयांना कोरोना झाला. त्यानंतर एका गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाली. रांजणवाडी भागात कोरोनाचे रूग्ण संख्या वाढु लागल्याने उपविभागीय अधिकारी संगिता राजापुरे यांनी रांजणवाडी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित केला. पालिकेने या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू करुन भाग सिल केला. या भागात प्रवेश करणे व बाहेर पडणे प्रतिबंधित करण्यात आले. यावरून रांजणवाडीमधील लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
अशातच रांजणवाडी भागातील रहिवाशांच्या सोईसाठी गुरूवारी पालिका व ग्रामिण रूग्णालयाच्या वतीने रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यासाठी खास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण 86 जणांची टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैकी 46 जणांची टेस्ट घेण्यात आली. यामधील एका गरोदर महिलेसह सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन गरोदर महिलांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उरलेल्या कोरोना रूग्णांना घेवुन जाण्यासाठी पालिकेचे अधिकारी डॉक्टर व त्यांचे सहकारी हे रांजणवाडी येथे आपल्या वाहनांचा ताफा घेवुन पोहचले, परंतु या रूग्णांना बरोबर घेवुन जाण्यास येथील लोकांनी विरोध केला. पथकाबरोबर स्थानिक लोकांची बाचाबाची सुरू झाली व तेथे मोठा जमाव जमला. परिस्थिती तणावपुर्ण झाली. आम्हाला सर्वांना बरोबर घेवुन जा, आमच्यावर येथेच उपचार करा, आम्ही रूग्णालयात येणार नाही. संपुर्ण गावच क्वारंटाईन करा, अशा मागण्या रांजणवाडी येथील रहिवाशांनी केल्या. काही उत्साही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. जमाव पथकातील अधिकाऱयांच्या अंगावर येवु लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांनी आपल्या कर्मचारी यांना घेवुन परत फिरण्याचा निर्णय घेतला. पथक परत फिरताना जमावाने मागुन दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू होताच एकच धावपळ सुरू झाली. एका वाहनात मुख्याधिकारी, डॉक्टर व काही कर्मचारी पटापट बसले व त्यांनी तेथुन पळ काढला. या धावपळीत पालिकेचे अभियंता सस्ते यांचे वाहन तेथेच राहिले हे वाहन जमावाने लक्ष केले. जमावाने वाहनाची तोडफोड केली. अनेकांनी जंगलात धुम ठोकली व आपला जीव वाचविला.
रांजणवाडी येथील परिस्थितीची माहिती मुख्याधिकारी यांनी पोलिसांना दिली. तसेच वरिष्ठांना दिली. घटनेची खबर मिळताच वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी हे पालिसांची कुमक घेवुन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक नासिर मुलाणी, युसूफ शेख, तौफिक पटवेकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर तणाव निवळला व रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला झाल्याने या संदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशीरा नाजनिन रौफ डांगे, नईम मुजावर, वाहीद उस्मान मुजावर, अझर बढाणे व इरत 100 ते 125 पुरूष व महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सर्वांवर भादवी कलम 353, 143, 147, 149, 269, 270, 427, 504, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2 नुसार महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे नियम 11, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 3 चा 2 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौकट :
पालिका कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन
पालिकेच्या पथकावर रांजणवाडी येथे जमावाने हल्ला केल्यामुळे पालिकेच्या कर्मचारी यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन सुरू केले. हल्लेखोरांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी बरोबरच अशा घटना पुन्हा घडु नये आणि घडल्यास कर्मचारी यांना संरक्षण मिळावे. अशा हल्ल्यात नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या कर्मचाऱयांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केल्या. मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील, नगरसेवक कुमार शिंदे यांनी कर्मचाऱयांच्या बरोबर चर्चा केली व त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱयांनी दुपार नंतर आपले आंदोलन मागे घेतले.
चौकट : पान 1 वर
नागरिकांच्या सहकार्याशिवाय साखळी तुटणार नाही-मुख्याधिकारी
अशाप्रकारे हल्ला करून काहीही साध्य होणार नाही. पालिका प्रशासन व वैद्यकिय पथक गेली तीन महिने नागरिकांच्या सुरक्षेसाठीच झटत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या सहकार्या शिवाय काहीही होणार नाही. प्रशासन तुमच्यासाठीच आहे अशी प्रतिक्रिया पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी व्यक्त केली.