अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार दि.9 ऑक्टोबर 2021, सकाळी 10.00
● मिशन कवचकुंडलचा शहरासह गावोगावी प्रारंभ
● नमुने संख्या पोहचली 21 लाख 40 हजारावर
● नव्याने होणारी बाधित वाढ रोखण्यात यश
● दुर्गा उत्सवात कोरोना नियमाचे पालन
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.32 वर
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील नव्याने कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या सव्वाशेच्या आत आली आहे. कोरोनाचे हे मूळ उपटून टाकण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कवचकुंडल हे मिशन हाती घेतले आहे. हे मिशन ग्रामीण भागासह शहरात शनिवारपासून ॲक्टिव्ह मोडवर सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक कसे टुचुकवंत बनून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सुरक्षा कवच मिळेल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्रवारी दिवसभरात 8180 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या तर नव्याने 108 जण बाधित आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.32 वर आहे.
बाधित संख्या अडीच लाखांसमीप
जगावर 2020 च्या मार्च एन्डनंतर कोरोनाचे मानव निर्मित संकट उदभवले. या संकटामुळे संपूर्ण जग हडबडून गेले. त्यापासून बचाव करण्यासाठी पुन्हा जागतिक पातळीवर शोध सुरू झाले. तोपर्यंत जगाच्या एका कोपऱ्यात उदभवलेला कोरोना कधी सातारा जिल्ह्यातील गावागावात घराघरात शिरला हे समजले नाही. बघता बघता कोरोनाची ही सतरा महिने एका भयानक स्वप्नासारखी निघून गेली. त्यात अनेकांचे भीतीने तर अनेकांचे चुकीच्या उपचार पध्दतीने तर अनेकांचे कोरोनाने बळी गेले. काहींनी मन घट्ट करून कोरोनावर मात करत परतवून लावले. आज जिल्ह्यात नव्याने आढळून येणाऱ्यामध्ये सव्वाशेच्या खाली आला आहे. तर दररोज सव्वा आठ हजार जणांच्या तपासण्या केल्या जात आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 21लाख 40 हजार 341 जणांच्या तपासण्या झाल्या आहेत. 2 लाख 49 हजार 985 जण आजपर्यंत बाधित आहेत. तर आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 2 लाख 40 हजार 796 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 6,336 जणांचा बळी गेला आहे तर अजून 6,392 जण उपचार घेत आहेत.
मिशन कवचकुंडल जिल्ह्यात सुरू
महाभारत हे एक युद्धच होतं. त्यामध्ये कवचकुंडल फक्त कर्णाकडे होती. तशी सध्याच्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला लसीकरण ही कवचकुंडले महत्वाची बनू पहात आहेत. हीच कवचकुंडले प्रत्येकाकडे असावे, प्रत्येकजण सुरक्षित रहावे,प्रत्येकाचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून शासन पातळीवर मिशन कवचकुंडले सुरू करण्यात आले आहे. शनिवारी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली असून, त्याचे परफेक्ट नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी केले आहे. त्यास शनिवारी सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुर्गा उत्सवात नियमाला महत्व
गेल्या सतरा महिन्यापासून कोणतेही सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे करता आले नाहीत. त्याला कारण कोरोनाची भीती, प्रशासनाने घातले गेलेली बंधणे आहेत. सध्या अनलॉक टप्याटप्याने जिल्ह्यात केले गेले आहे. नुकतीच शाळा, मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. पण कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनात अजून असल्याने सुरू असलेल्या दुर्गा उत्सवात नियमाला महत्व दिले जात आहे. शहरात दुर्गा उत्सव मंडळांचा जसा साधेपणा आहे तसाच गावोगावी दिसुन येत आहे. नऊ दिवस कडक उपवास नवरात्र उत्सवात करून दररोज सकाळी आणि संध्याकाळी गावाच्या देवी मंदिरात उपवासकरी पारंपरिक पद्धतीने जमत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या नियमामुळे मंदिर अजून ही ओस असून उपवास करणारे नव्रतरकरी शासनाच्या नियमाना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांची तशी मंदिरावर करडी नजर आहे.
बहुतांशी सर्वच तालुके येत आहेत नियंत्रणात
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील सातारा, कराड आणि फलटण या तीन तालुक्यात दररोज बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या पासून अनेकांना धडकी भरायची. अख्खी कुटूंबच्या कुटुंब बाधित व्हायची अन् वाळीत टाकल्याप्रमाणे ते कुटूंब क्वारंटाईन केले जात होते. त्यांच्याशी ज्यांच्या संपर्क होईल त्यांना ही भीती वाटत होती. आता मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही सव्वाशेच्या खाली आली आहे. बाधित वाढ मंदावली आहे. काहीजण मास्क वापरत नसले तरी त्यांना आपण दोन डोस घेतले याची जाणीव होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय मेळावे कार्यक्रम आंदोलने होऊ लागले आहेत. नेत्यांच्या तर तोंडावरचा मास्क गायब असल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळते आहे. आता सर्वच 11 तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 21,40341
एकूण बाधित – 249985
घरी सोडण्यात आलेले – 240796
मृत्यू –6336
उपचारार्थ रुग्ण– 6392