प्रतिनिधी/ सातारा
सदरबझार येथील एका युवकास कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर तेथील कॉलनीतील नागरिकांकडून चुकीची वागणूक त्याच्या कुटुंबियांना मिळत आहे. अशी तक्रार अर्जाद्वारे त्या कुटुंबियाने शाहुपूरी पोलिसांकडे केली आहे.
जहिरुद्दीन बालिगार यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, दि. 28 जुन रोजी रशियावरुन माझा मुलगा आला. तो मुंबईवरुन सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून सातारा येथे पोहचला.परंतु दि.3 रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला.त्यामुळे तो सिव्हीलमध्ये उपचार घेत आहे. मात्र, आमच्या कॉलनीतील काही अविचारी नागरिकांना ही बाब जेव्हा समजली तेव्हा त्यांनी तुच्छतेची वागणूक देण्यास सुरुवात केली. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी शाहुपूरी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.