अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021, सकाळी 9.30
● जिल्ह्यात मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा ● नियम उरले फक्त कागदावरच ● बाधित वाढ मंंदावल्याने कारवाईत ढिलाई ● जिल्ह्यात 24 तासात 560 नवे बाधित ● तिसरी लाट रोखण्यासाठी नियम अमलबजावणीची गरज
सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्याचे प्रचंड नुकसान करून कशीबशी कमी होऊ पहात आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसात रूग्णवाढ आणि मृत्यूदरातील आकड्यांनी दुसरी लाट कमी होत असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी नियमांची होणारी पायमल्ली पाहता दुर्दैवाने तिसरी लाट येण्याचे आमंत्रण ठरू शकते. बाधित वाढ मंदावल्याने प्रशासनानेही मास्क, सोशल डिस्टन्स, दुकानांमधील गर्दीच्या कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 560 नव्या रूग्णांची भर पडली असून पॉझिटिव्हीटी रेट 5.49 वर आला आहे.
सातारा, फलटणही सावरतेय
जुलै महिन्यासह ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सातारा, कराड, फलटण, खटाव, माण या तालुक्यात बाधित वाढीने चिंता वाढवली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या तालुक्यतील वाढ कमी झाली. कोरेगांव, वाई, महाबळेश्वरसह इतर तालुक्यात वाढीवर नियंत्रण आले आहे. मृत्यूदरही आटोक्यात आला आहे. एका बाजूला हा प्रशासकीय आकड्यांचा घोळ कमी झाल्याचा परिणाम असून दुसरीकडे दैनंदिन येणारे खरे आकडे त्याच दिवशी येत असल्याने आकडेवारीतील घसरण दिसत आहे.
नियम फक्त कागदावर नको…अमलबजावणी हवी
जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनलॉक झाले. अनलॉक झाल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. गर्दीत मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचे स्टॅंड गंजून कोलमडून पडले. काही ठिकाणी गायब झाले. त्यामुळे दुसरी लाट प्रचंड वेगाने आली. या लाटेच्या वेगाने जिल्ह्याच्या प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक कंबरडे मोडलेच पण अनेक कुटूंबांचे वैयक्तिक नुकसानही केले. त्यामुळे सध्याच्या अनलॉकच्या काळात यातून शहाणपण घेणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
गुरुवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण तपासणी 18,18,164 एकूण बाधित 2,41,444 एकूण कोरोनामुक्त 2,27,945 एकूण मृत्यू 6,051 एकूण उपचारार्थ 10467
गुरुवारी जिल्हय़ात
बाधित 560 मुक्त 733 मृत्यू 01