अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 6 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.10
● जानेवारी महिन्यात केवळ 52 जणांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
● कोरोनामुक्तीचा दर वाढला
● शनिवारी दिवसभरात 2758 जणांचे स्वॅब तपासणी
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून बाधितवाढ कमी होवू लागल्याचा दिलासा आहे. लक्षणे असलेल्यांची स्वॅब तपासणी केली जात असून शनिवारी दिवसभरात 2758 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. रविवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने बाधित 292 जण आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 10.59 वर आलेला आहे. कोरोनामुक्तीचा दर वाढलेला आहे. जानेवारी महिन्यात कैलास स्मशानभूमीत केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 52 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जानेवारीमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या 52 जणांवर अंत्यसंस्कार
येथील संगमाहुली येथील कैलास स्मशानभूमीत कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. जानेवारी 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 53 जणांवर तर 132 जण अन्य कारणाने मृत्यू झालेले असे 185 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर जानेवारी 2022 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 52 जणांवर तर इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या 148 अशा 200 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूदर जिल्ह्याचा कमीच आहे. तो रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे.
बाधितवाढ होवू लागली कमी
नव्याने बाधित वाढ आढळून येत असलेल्यांची संख्या फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून कमी होत राहिली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये 2471 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. तर दि.6 रोजी जाहीर झालेल्या अहवालात 292 जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख 77 हजार 992 एवढी झालेली आहे. तर कोरोनामुक्तीचाही दर वाढलेला असून कोरोनामुक्तीही बाधित आढळून येणाऱ्यांपेक्षा जास्त असून जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सगळय़ात कमी बाधित हे महाबळेश्वर तालुक्यात आढळून येत आहेत. त्यापाठोपाठ जावली, पाटण, वाई या तालुक्यांचा समावेश होतो. तर सगळयात जास्त बाधित वाढ ही सातारा तालुक्यात आढळून येत आहेत. सातारापाठोपाठ कराड, फलटणचा क्रमांक लागतो.
रविवारी
नमूने- 2758
बाधित-292
रविवारपर्यंत
नमूने-25,14,999
बाधित-277995
मृत्यू-6620
मुक्त-266679