अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 1 सप्टेंबर 2021, सकाळी 10.15
●चाचण्यांच्या प्रमाणात बाधित संख्या होऊ लागली कमी
●आतापर्यंत 6 हजार 22 जण कोरोनामुळे दगावले
●फलटणकरांची चिंता काही केल्या कमी होईना
●वाई, महाबळेश्वर, जावली येतेय आटोक्यात
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील दररोजच्या चाचण्या 11 हजारांच्या आसपास होत आहेत. त्या प्रमाणात बाधित संख्या कमी होत असून, जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. एका बाजूला जिल्ह्यातील 10 तालुके सावरू लागले असताना फलटण तालुक्यात मात्र बाधित वाढ होत आहे. त्यामुळे फलटणकरांची चिंता वाढली आहे. नव्याने काल दिवसभरात 11,503 जणांच्या तपासण्या झाल्या असून, 579 बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 वर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 6 हजार 22 जणांचा बळी
कोरोनाची एन्ट्री सातारा जिल्ह्यात सोळा महिन्यापूर्वी झाली. त्यावेळी कोरोनापासून कसा बचाव करता येईल, याकरिता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अनेक कार्यशाळा घेतला. मार्गदर्शन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना केले होते. अगदी हात धुण्याचं ही प्रशिक्षण दिलं होतं. मात्र, पहिला बळी सातारा तालुक्यातील खेड येथील कोरोनाने घेतला होता. मृत्यू किती भयंकर असतो याची दाहकता त्यावेळी दिसून आली. कोरोनामुळे अनेक कुटुंबातील करती व्यक्ती हिरावून नेली तर अनेकांची ताटातूट झाली. काहींच्या तर घरात एकटेच राहिले. अगदी रुग्ण सेवा करणारे डॉक्टर ही यापासून वाचू शकले नाहीत. मृत्यू हा अटळ असला तरी तो असा नको हे प्रत्येकाला वाटते. कोरोना मात्र मृत्यूला कवटाळत राहिला. त्यात त्याने भेदभाव केला नाही. कोणी लहान, मोठं समजलं नाही. जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाने बळी गेलेल्या 6 हजार 22 मध्ये जास्त करून वृद्ध रुग्णाची संख्या जास्त आहे. हा मृत्यू काही थांबला नसून बहुतांशी मृतदेहावर सातारच्या संगममाहुली येथील कैलास स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
फलटण तालुका का येईना आटोक्यात?
सुरुवातीला पहिल्या फलटण तालुक्यातील मोठ्या गावांनी उसळी घेतली होती. मुंबई, पुणेकर गावी आले होते त्यावेळी प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले होते. मात्र दुसऱ्या लाट जिल्ह्यात ओसरत असताना फलटण तालुक्यातील आकडा हा वाढत राहिला आहे. फलटणचे जास्त दळणवळण बारामती, पुणे राहिले आहे. आरोग्य यंत्रणा जरी प्रयत्न करत असली तरी नेमके काय चुकते हे मात्र अद्याप सापडले नसून फलटणकरांची डोकेदुखी ठरू पहात आहे.
चाचण्यांचा टप्पा 18 लाखाच्या पुढे
सातारा जिल्ह्यात दररोज 11 ते 12 हजार तपासण्या होत आहेत. त्यामुळे आजपर्यंत 18,09,111 एवढ्या तपासण्या झालेल्या आहेत तर काल दिवसभरात 11, 503 जणांच्या तपासण्या झाल्या. आरएटी टेस्ट 7481 करण्यात आले. आरटीपीसीआर टेस्ट 4020 झाल्या आहेत. त्यामुळे होण्याचे प्रमाण तेवढे असून अजून निम्मी लोकसंख्या तपासणी होण्याची उरली आहे.
कोरोना मुक्तीचे प्रमाण कमी
बाधित संख्या जेवढी आढळून येते त्याच्या निम्म्याने कोरोनावर मात करणारे आहेत. कधी हे प्रमाण समान असते तर कधी थोडे ज्यादा असते. जिल्ह्यातील बाधित संख्या ज्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात मुक्तता झालेल्यांचे असायला हवे. मात्र तसे दिसत नाही.
बुधवारपर्यंत
एकूण नमूने – 18,09,111
एकूण बाधित –2,40,087
घरी सोडण्यात आलेले 2,27,141
मृत्यू -6,022
उपचारार्थ रुग्ण- 9,711