प्रतिनिधी /रत्नागिरी :
सोमवारी सायंकाळपासूनच्या 24 तासात जिल्हय़ात 47 नवे रूग्ण सापडल्याने बाधीतांच्या संख्येने तेराशेचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये रत्नागिरी शहरातील एका खासगी रूग्णालयातील 10 जणांचा समावेश आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील 65 वर्षीय रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 42 झाली आहे.
सोमवारी रात्री अहवालांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथे नमुने घेतलेले 21, उपजिल्हा रुग्णालय कामथे 24, कळबणी – 1 व ऍन्टीजेन चाचणीमध्ये 1 रूग्ण पॉझीटीव्ह आढळला आहे. यामुळे एकूण बाधीतांची संख्या 1309 झाली आहे. यामध्ये रत्नागिरी शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमधील तब्बल 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. संपर्कात आलेल्या सर्व रूग्ण व कर्मचारी, डॉक्टर यांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. एकाचवेळी 10 लोक पॉझिटीव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण आणखीन वाढला आहे.
गेल्या आठवडय़ात याच हॉस्पीटलधील एक कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर रूग्णालयातील सर्व कर्मचारी आणि रूग्णांचे ऍन्टीजेन चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे 2 नर्ससह 4 जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा सर्वांचे स्वॅब चाचणीसाठी देण्यात आले यावेळी सोमवारी रात्री यातील 10 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
कोरोनामुक्तांची संख्या 768
मंगळवारी 19 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 768 झाली आहे. मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली 15 आणि कामथे येथील एकाचा समावेश आहे.
वृद्धाचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील एका 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला. जिल्हा कोव्हीड रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. हा राजापुर तालुक्यातील कोरोनाबाधीताचा दुसरा तर जिल्हय़ातील 42 वा मृत्यू आहे.
मृतांची तालुकानिहाय आकडेवारी
रत्नागिरी -8
खेड – 4
गुहागर -2
दापोली -10
चिपळूण – 8
संगमेश्वर – 6
लांजा – 1
राजापूर – 2
मंडणगड – 1
604 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 14 हजार 596 नमुने तपासण्यात आले आहेत. यातील 1308 अहवाल पॉजिटीव्ह तर 12 हजार 681 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 604 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे.
जिल्हय़ात सुमारे 2 लाख व्यक्ती दाखल
परराज्यातून व अन्य जिह्यातून रत्नागिरी जिह्यात 20 जुलै पर्यंत 1 लाख 98 हजार 215 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून बाहेर गेलेल्यांची संख्या 1 लाख 334 आहे. जिल्हय़ात होम क्वारंटाईन खाली असणाऱयांची संख्या 15 हजार 510 इतकी आहे.