प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळात स्वच्छतेचे काम व्यवस्थित करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. मात्र, या सूचनेचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहर व उपनगरांच्या विविध भागात आणि बाजारपेठेत कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. बापट गल्ली येथील कारपार्किंग परिसरात कित्येक दिवसांपासून कचऱयाची उचल करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
महापालिकेच्यावतीने घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. व्यावसायिक आस्थापनांतील कचरा उचल करण्यासाठी विशेष वाहन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱयांनी दिली आहे. प्रत्यक्षात कचऱयाची उचल वेळेवर केली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरातील विविध रस्त्यांशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. कचराकुंडय़ा हटविण्यासाठी महपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण कचराकुंड कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. त्यामुळे शहर परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्यापासून गटारी स्वच्छ करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी गटारी तुंबून दुर्गंधी पसरत आहे. पाऊस आल्यानंतर गटारीमधील कचरा रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छतेचा नमुना चव्हाटय़ावर येत आहे. तरीही याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.
बापट गल्ली येथील कारपार्किंग परिसरात नेहमी वर्दळ असते. पण या ठिकाणी कचऱयाचे ढीग साचत आहेत. शहरासह परराज्यांतील नागरिक बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येत असतात. हे नागरिक बापट गल्लीमध्ये वाहने पार्क करतात. पण कचऱयामुळे नागरिकांना अस्वच्छतेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. कारपार्किंगमध्ये पार्किंग फी वसुलीसाठी महापालिकेचे कर्मचारी दिवसभर थांबून असतात. पण त्यांच्याकडूनही कचरा उचलीच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही होत नाही. परिसरातील व्यावसायिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरासह वर्दळीच्या ठिकाणी साचलेल्या कचऱयाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.