प्रतिनिधी/ गोडोली
शहराच्या प्रवेशद्वारात अर्ध्या गोडोली गावाचे सांडपाणी काही खासगी व्यक्तींच्या शेतात वाहून जाते. नगरपालिकेने याची आजअखेर व्यवस्था केली नसल्याने आजूबाजूच्या नागरिकांना नाहक प्रचंड त्रास होत आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी या कामाचा ही नारळ फुटेल असे स्थानिकांना वाटले होते. त्यामुळे आता बापट साहेब, तुम्हीच नारळ फोडून काम करुन दाखवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
ऐतिहासिक सातारा शहराचे प्रवेशव्दार असलेल्या गोडोली नाक्यावर वर्षानुवर्षे खासगी जागेत सांडपाणी वाहते. अर्ध्या गावाचे हे सांडपाणी असून सुनियोजन नसल्याने ही बोंब झाली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी, मच्छर, अनेक किटकांच्या प्रादुर्भावाचा त्रास स्थानिक नागरिकांना होतो. याबाबत पालिकेने एकवेळ ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यात सांडपाण्याची व्यवस्था होत नसतानाही बांधकाम व्यावसायिकांनी पैशाच्या बळावर परवानगी घेऊन नव्याने काही अपार्टमेंट उभी करून दाखवली आहेत. त्या सर्व अपार्टमेंटचे ही सांडपाणी याच खासगी जागेत सोडून दिले आहे.
गेली काही दिवस शहर परिसरात दोन्ही आघाडीकडून विकास कामांच्या उद् घाटनाचे धडाधड नारळ फुटले. दरम्यान या सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी नारळ फुटेल, अशी सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱया नागरिकांची अपेक्षा होती. तो फुटला नसल्याने निराश झालेल्या नागरिकांनी सध्या नगरपालिकेचा चार्ज असलेल्या मुख्याधिकारी बापट साहेबांनी या कामाचा नारळ फोडून काम फत्ते करून दाखवून लोकप्रतिनिधींना चपराक द्यावी, अशी मागणी सांडपाण्याचा त्रास होणाऱया नागरिकांनी ’तरुण भारत’ शी बोलताना केली आहे.
बांधकामावर परवानगी मिळाली कशी ?
बांधकाम करण्यासाठी असलेल्या नियमात सांडपाण्याची व्यवस्था मिळकत धारकांनी करावी असे असताना शहरातील बडय़ा व्यावसायिकांनी गोडोली नाका परिसरात उभारलेल्या अपार्टमेंटचे सांडपाणी सुध्दा खाजगी जागेत सोडून दिले आहे. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसताना या अपार्टमेंट बांधकामाला परवानगी मिळाली कशी,हाच संशय व्यक्त होऊ लागला आहे. लाचार शासकीय अधिकारी पैशाच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्याचा प्रकार या परिसरात उघड दिसतो.नियम कितीही कडक असले तर ते सामान्यांना मात्र व्यावसायिकांच्या पुढे लाचार झालेल्या शासकीय अधिकायांमुळे हा सांडपाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
चिकन गुणीया चा धोका
अर्ध्या गावाचे सांडपाणी उघडय़ावर पसरल्याने मोठय़ा प्रमाणावर जंतुसंसर्ग होण्यास कारणीभूत ठरु शकते. सध्या चिकनगुणीयाचा प्रादुर्भाव संभवत असताना प्रवेशद्वारातील हे सांडपाणी शहराला धोकादायक ठरु शकते, अशी भिती नागरिक व्यक्त करत आहेत.