कौटुंबिक वादातून मुलाचा निर्घृण खून, वारणा कापशी परिसरात खळबळ
प्रतिनिधी/सरूड, शाहूवाडी
वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव राकेश केसरे या साडेपाच वर्षे वयाच्या बेपत्ता बालकाचा त्याच्याच निर्दयी बापाने गळा घोटून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जन्मदाताच चिमुकल्याचा कर्दनकाळ ठरल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी राकेश सर्जेराव केसरे याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून मुलाचा निर्घृण खून केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील हे करीत आहेत.
याबाबतची माहिती अशी, 3 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आरव हा अंगणात खेळत होता. पण वेळेत तो घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. पण न सापडल्याने तो गायब झाल्याची फिर्याद त्याचे वडील राकेश केसरे यांनी शाहूवाडी पोलिसात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांच्या साथीने शोधमोहीम राबविली. सोमवारी दिवसभर सर्वत्र कसून शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरवचा मृतदेह त्याच्या घरापासून शंभर फूट अंतरावर हळद, कुंकू, गुलाल टाकलेल्या अवस्थेत आढळला. हा घटनेने जिल्हा हादरला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आरवचा नरबळी असावा अशी शंकाही काहीजणांनी व्यक्त केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या सूचनेवरून तपास यंत्रणा गतिमान करून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या.
ग्रामस्थांसह नातेवाईकांची कसून चौकशी
बुधवारी दुसऱया दिवशीही वारणा कापशीसह शाहुवाडी तालुक्यात तणावपूर्ण वातावरण असून कापशी येथे पोलीस बंदोबस्त कायम ठेवला होता. मात्र खून होऊन दोन दिवस उलटले तरीही आरोपी न सापडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, याप्रकरणी आरवच्या काही नातेवाईक, काही ग्रामस्थ अशा एकूण अकरा संशयितांकडे कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
ठोस माहिती पुढे न आल्याने नागरिकांतून उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे. मात्र तपास सुरु असून लवकरात लवकर आरोपींना जेरबंद केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. त्या दिशेने तपास गतिमान करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाच टीम कार्यरत केल्या. पोलीस उपअधीक्षक रवींद्र साळोखे साळोखे यांच्यासह पोलीस निरीक्षक विजय पाटील हे 5 टीमच्या माध्यमातून तपास यंत्रणा राबवत होते.
वारणा कापशीसह आसपासचा ग्रामीण भाग पिंजून काढत पोलीसांकडून विविध मार्गाने तपास सुरु होता. चिमुकल्या आरवच्या खुनाच्या धक्क्याने आरवची आई, आजी आणि मावशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, नरबळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात होती. मात्र आरवचा खुन नरबळीतून झाल्याची शक्यता धूसर असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाजवळ गुलाल, हळद व अन्य साहित्य टाकले असावे, असा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले.
खूनप्रकरणी पोलिसांचा अकरा जणांवर संशय असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु होती. दरम्यान, रात्री उशिरा बापानेच आपल्या मुलाचा खून केल्याचे समोर आले. आरवचा खून करून निर्दयी बापाने आपल्याच राहत्या घरापासून शंभर फूट अंतरावर मृतदेह ठेवून त्याच्यावर हळद, कुंकू, गुलाल टाकून नरबळी असल्याची दिशाभूल करण्याचा केलेला प्रयत्नही पोलिस तपासात उघड झाला. चिमुकल्याच्या शोधासाठी पुढे पुढे करणारा बापच खूनी असल्याचा पोलिसांचा संशय अखेर खरा ठरला. निर्दयीपणे खून करून दोन दिवस सर्वांची दिशाभूल करणाऱया बापाचे नाटक संपल्याने स्वतःच शेवटी त्याने खुनाची कबूली दिली.