गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी
प्रतिनिधी/ सातारा
विघ्नहर्ता, बाप्पाचे आगमन शनिवारी होत आहे. कोरोनाचे संकट असल्याने अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार यावर्षी बाप्पांच्या स्वागताला ना बँड ना ताशा ना ढोल केवळ दोनच जणांनी मूर्ती आणायला जायचे असे पालिका प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. त्याकरता मूर्ती आणायला स्टॉलवर सोशल डिस्टनन्स ठेवून गर्दी दिसत होती. हरतालिका उपवासाचा दिवस असल्याने बाजारात केळी व फळे महागली होती. महिलांनी हरतालिका उपवास करून पूजन केले. पालिकेकडे ऑनलाईन नोंदणी केवळ 70 सार्वजनिक गणेश मंडळांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट वाढत असतानाही बाप्पाच्या स्वागताची दिमाखात तयारी सुरू असून यासाठीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली होती.
कोरोना महामारीचे संकट आले असून या संकटाचे विघ्न टळू दे अशी प्रार्थना गणेश भक्तांकडून केली जात आहे. यावर्षी कोणताही सण, उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. फक्त दुःख आणि दुःख हेच माणसासमोर उभे ठाकले आहे. अशा वातावरणात संकटमोचक गणपती बाप्पाचे आगमन दि. 22 रोजी सकाळी 9.30 पासून ते सायंकाळी पावणे आठपर्यंत मुहूर्तावर होत आहे. प्रशासनाने मुहूर्त पाळू नका, गर्दी करू नका, मूर्ती आणून प्रतिष्ठापना करा असे आवाहन केले आहे. त्यानुसार सातारा शहरात शुक्रवारी सकाळपासून मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांची गडबड सुरू होती. सोशल डिस्टनन्स पाळून गर्दी दिसत होती.
हरितालिका उपवास महिलांनी केले असून पूजन केले. पूजेसाठी व उपवासाला लागणारे फळे बाजारपेठ महागली होती. केळी 50 ते 60 रुपये डझन, सफरचंद 150 रुपये किलो अशी भेटत होती. दरम्यान, गणेश मूर्ती आणायला केवळ दोन जणांना परवानगी दिली आहे. सातारा पालिकेने केलेल्या आवाहनानुसार शहरातील 70 गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. दरवर्षी वाजतगाजत येणारे बाप्पा यावर्षी अतिशय साधेपणाने आगमन होण्यास सुरुवात झाली होती.
शुक्रवारी दिवसभर बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक जण तयारी करत होता. ठिकठिकाणी पुजेच्या आणि सजावटीच्या साहित्यासाठी भक्तांची रिघ लागली होती. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षची चतुर्थी तिथी शुक्रवार दि. 21 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजून 02 मिनटांनी सुरू होत आहे. आणि शनिवार 22 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटापर्यंत मुहूर्त आहे.
पोलिसांची करडी नजर…
गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असूनही ते होत नाही. यामुळे सकाळपासून स्टॉलवर, बाजारपेठेत पोलिसांनी वॉच ठेवला आहे. गर्दी केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.