पाचजणांचाबळी-बोरगलगावावरशोककळा,घटनेनेहुक्केरीतालुकाहादरला
प्रतिनिधी/ संकेश्वर
बापाने आपल्या तीन मुलींसह मुलाला विष पाजून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवार दि. 23 रोजी दुपारी बोरगल (ता. हुक्केरी) येथे उघडकीस आली आहे. पाचजणांना मृतावस्थेत पाहून एकच धक्का बसला असून संपूर्ण गाव या घटनेने शोकाकूल झाले आहे. हुक्केरी तालुक्यात अशी पहिलीच घटना असल्याची चर्चा पुढे आली आहे.
गोपाल दुंडाप्पा हादीमनी (वय 46), मुली सौम्या गोपाल हादीमनी (वय 19), श्वेता गोपाल हादीमनी (वय 14), साक्षी गोपाल हादीमनी (वय 12) व मुलगा सृजन गोपाल हादीमनी (वय 10) अशी मृत बाप-लेकरांची नावे आहेत.
या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी की, शनिवार दि. 23 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत घरातून कुणीच बाहेर आले नाहीत. पाहुण्यांनीही केलेला फोन उचलला नाही. दारही आतून बंद आहे. त्यामुळे नेमके काय झाले, या संशयापोटी शेजाऱयांनी घरावरील कौले काढून आत पाहिले असता घरातील सर्वजनच मृतावस्थेत इतरत्र पडलेले दिसले. माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली.
संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेऊन बंद दरवाजा तोडून घटनेची पहाणी केली असता, बापासह चारही लेकरांनी विष प्राशन केल्याचे आढळून आले. घटनेचे गांभीर्य पहाता बापानेच स्वतःसह लेकरांना विष पाजून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पत्नीच्या मृत्यूने बिघडली मानसिकता
गेल्या तीन महिन्यापूर्वी कोरोनाच्या काळात ब्लॅक फंगस आजाराने हुबळी येथे पत्नी जयश्री गोपाळ हादीमनी हिचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर हे कुटूंब पूर्णपणे मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. पत्नी घरी नसल्याच्या मानसिकतेचा अतिरेक झाल्याने व यापुढे आपले कसे, या विचाराने त्रस्त झालेल्या पती गोपालने शुक्रवारी मध्यरात्री लेकरांना विष पाजून आपणही विष घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
माजी सैनिक
गोपाल हा भारतीय सैन्यदलात सेवेत होता. गेल्या तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्याने ते गावीच रहात होते. गोपाल यांच्या मालकीची 3 एकर बागायत जमीन, 3 ट्रक, 1 कार, 1 ट्रक्टर असून 20 लाख रुपये खर्च करुन बंगलाही बांधत आहेत. किरकोळ कामबाकी असल्याने हे काम उरकून मोठय़ा थाटाने बंगल्याची वास्तूशांती समारंभ करण्याची माहिती त्यांनी आपल्या शेजाऱयांनी दिली होती. यावरुन हे कुटूंब आर्थिक बाजूने सधन असताना आत्महत्येमागे नेमक आणखी कोणते कारण असावे, अशी चर्चा पुढे आली आहे.
घटनेतील सर्व मृतांची उत्तरीय तपासणी करुन अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईक व गावकऱयांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रात्री उशिरा या मृतांवर अंत्यविधी करण्यात आली. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी हे करीत आहेत.