ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत सांगितली. तसेच त्यासाठी ‘श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची घोषणाही केली. राम मंदिर ट्रस्टच्या घोषणेनंतर आता राजकारण सुरू झाले आहे. एकीकडे भाजप नेते त्यावर आनंद व्यक्त करीत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राम मंदिर ट्रस्टवरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला आम्ही विसरलो नाही आणि आपल्या पिढय़ांना ते विसरू देणार नाही.
तसेच संसदेचे अधिवेशन 11 फेब्रुवारी रोजी संपत आहे. तसेच दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे यानंतर ही घोषणा करता येऊ शकली असती. या घोषणेच्या वेळेवरुन असं वाटतंय की भाजप दिल्लीच्या निवडणुकीवरुन चिंताग्रस्त झाली आहे. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे.
ज्या लोकांनी बाबरी मशिदीचा ढाचा तोडला होता त्यांच्याकडेच मंदिर बनवण्याचे काम देण्यात येत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी यावेळी केला.