सुदैवाने अपघात टळला : वाहतूक ठरतेय धोकादायक : नागरी पुरवठा खात्याला मोठा आर्थिक फटका
प्रतिनिधी /बेळगाव
रेशनची धान्य वाहतूक करणाऱया ट्रकमधून धान्याची नासाडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटका अन्न व नागरी पुरवठा खात्याला बसत आहे. बामणवाडी मार्गावर रेशन धान्य वाहतूक करणाऱया ट्रकची संख्या वाढली आहे. दरम्यान वाहतूक करणाऱया ट्रकमधून काही धान्याची पोती रस्त्यावरच पडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
हुंचेनहट्टी-नावगे मार्गावर असलेल्या गोदामातून रेशन धान्यांची वाहतूक केली जाते. वाहतूक बामणवाडी मार्गावरून अधिक प्रमाणात होते. दरम्यान हा मार्ग अरूंद असल्याने वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. शिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात घडत असल्याने ही धान्याची वाहतूक इतर मार्गावरून वळवावी अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली आहे. दरम्यान बुधवारी पुन्हा बामणवाडी गावात वळणावर धान्याची वाहतूक करणाऱया ट्रकमधून पोती रस्त्यावर पडण्याचा प्रकार घडला आहे. यावेळी ट्रकच्या पाठीमागे कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या अरुंद मार्गावर रेशनची वाहतूक करणाऱया ट्रकचा धोका वाढला आहे.
हुंचेनहट्टी-नावगे मार्गावर असलेल्या गोदामातून रेशन धान्याची ने-आण करण्यासाठी शेकडो ट्रकची ये-जा असते. या अरुंद मार्गावर रेशन धान्याच्या ट्रकची वाहतूक वाढल्याने लहान शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान गल्लीतील वळणावर सातत्याने अपघात घडत आहेत. अवजड वाहने या मार्गावर वळत नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची ग्रामस्थांना डोकेदुखी ठरली असून, रेशन धान्याची वाहतूक इतर मार्गावरून वळवावी अशी मागणी जोर धरत आहे.