दडपशाही मार्गाने हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्याचा घाट, शेतकऱयांचा तीव्र विरोध
वार्ताहर / किणये
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही पोलीस बळाचा वापर करून मंगळवारी पुन्हा बायपास रस्त्याचे कामकाज सुरू करण्यासाठी मच्छे शिवारात मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह कंत्राटदार, प्रशासनाचे अधिकारी मच्छे शिवारात दाखल झाले. याची माहिती शेतकऱयांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि संतप्त शेतकऱयांनी या रस्त्याला विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यासाठी आपल्या सुपीक जमिनी देणार नाही, असे ठणकाहून सांगितले. तसेच आलेल्या अधिकाऱयांना पळवून लावले.
उच्च न्यायालयाने हलगा-मच्छे बायपाससाठी स्थगिती दिली आहे. तरीही विकासाच्या नावावर सुपीक जमिनी हडप करण्याचा घाट प्रशासनाने चालविला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे कामकाज करण्यासाठी मंगळवारी सकाळी आलेल्या अधिकारी, पोलीस व कंत्राटदार यांना शेतकऱयांनी चांगलेच धारेवर धरले. तुम्ही न्यायालयाचा अवमान का करत आहात? या रस्त्याचा खटला न्यायालयात सुरू असताना आमच्यावर दंडेलशाही का लादत आहात? कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमिनी देणार नाही, हवे असेल तर आमच्या अंगावरून जेसीबी चालवा, असे शेतकऱयांनी ठणकावून सांगताच प्रशासकीय अधिकाऱयांनी तेथून काढता पाय घेतला.
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी जे प्राथमिक नोटिफिकेशन काढण्यात आले, त्यामध्ये झिरो पॉईंट ते 84 कि. मी. राष्ट्रीय महामार्ग ए असा उल्लेख आहे. झिरो पॉईंट हा शहराच्या मध्यभागी असलेल्या फिश मार्केटजवळ येतो. ही वास्तविकता असताना अलारवाड क्रॉसपासून जुने बेळगाव, शहापूर, वडगाव, अनगोळ, मच्छे आणि पिरनवाडी या परिसरातील सुपीक जमिनीत हा बायपास रस्ता केला जात असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राजू मरवे, प्रकाश नायक यांनी दिली.
शेतकऱयांची दिशाभूल करून पोलीस दडपशाहीने कित्येक वेळा या रस्त्यासाठी जमीन कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱयांनी त्याला वेळोवेळी विरोध केला. मागील वर्षी शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून त्यामधून रस्ता करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. त्यानंतर बहुतांश शेतकऱयांनी या बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली. आणि बाजू खंबीरपणे मांडली.
नोटिफिकेशन एक तर कब्जा दुसरीकडे
अलारवाड क्रॉसपासून होणारा हा रस्ता बेकायदेशीर कसा आहे, हे कायदेशीर आणि कागदोपत्री न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. नोटिफिकेशन एक तर कब्जा दुसरीकडे हा प्रकार चुकीचा असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. शेतकऱयांची बाजू जाणून घेऊन न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे.
न्यायालयाकडून रस्त्याला स्थगिती मिळाली असताना वारंवार शेतकऱयांवर दडपशाही करण्यात येत आहे. सोमवारी याबाबत बेळगाव ग्रामीणच्या एसीपी यांच्या कार्यालयात शेतकऱयांची बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱयांची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, समस्त शेतकऱयांनी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बायपास रस्त्याला तीव्र विरोध दर्शविला. असे असताना मंगळवारी प्रशासनाने रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह जेसीबी घेऊन कामकाज सुरू करण्यासाठी आल्यानंतर घटनास्थळी शेतकरी मोठय़ा प्रमाणात जमले. येथील जमीन सुपीक असून एक इंचही जमीन आम्ही देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेणाऱया प्रशासनाच्या विरोधात शेतकऱयांनी जोरदार घोषणा दिल्या. मच्छे शिवारातच मंडप थाटून शेतकऱयांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. यावेळी जयश्री गुरण्णावर, संजय सुळगेकर, महादेव मंगणाकर, सुभाष चौगुले, रवि मरवे, भुपाल सोमणाचे, विजय बुद्रुक, भैरू कंग्राळकर, लक्ष्मण देमाणी, तानाजी हलगेकर, भालचंद्र सनदी, भुपाल सनदी, शाम बागेवाडी, राजू मरवे, प्रकाश नायक, अनिल अनगोळकर आदी उपस्थित होते.
बायपास रस्त्यासाठी आपली शेतजमीन जाणार असल्याने मच्छे परिसरातील शेतकरी मंगळवारी घटनास्थळी दाखल झाले होते. आई-वडील प्रशासनाच्या विरोधात लढा देत असतानाच त्यांची मुले-बाळेही मच्छे शिवारात आली होती. त्यांनी चक्क जेसीबीच्या समोर बसून या बायपास रस्त्याला आपला विरोध दर्शविला आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
बेळगाव : हालगा-मच्छे बायपासचे काम मंगळवारी अचानकपणे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला शेतकऱयांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे आता गुरूवार दि. 11 रोजी दुपारी 4 वाजता शेतकऱयांची बैठक घेण्यात येणार आहे. तरी हालगा-मच्छे बायपासमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱयांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या बैठकीला लोकप्रतिनिधीसह अधिकारी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शेतकऱयांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर रस्त्या संदर्भातील चर्चा थेट शेतकऱयांशी केली जाणार आहे. न्यायालयात हा वाद असताना हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कायमच विरोध करणार-प्रकाश नायक
सुपीक जमिनी वाचविण्यासाठी आम्ही शेतकऱयांनी एकत्र आले पाहिजे. शेतकरी लढय़ासाठी जात-पात, भाषा भेद कोणीही मानू नका, काळय़ा मातीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या नावावर प्रशासनाने आम्हा शेतकऱयांची सुपीक जमीन हिसकावून घेऊन कटकारस्थान रचले आहे. त्याला आम्ही कायमच विरोध करणार आहोत.
तर जगणे मुश्कील-अनिल अनगोळकर
गेल्या पाच-सहा वर्षांपासून आम्ही बायपासविरोधात न्यायालयीन लढा देत आहोत. आमच्या सुपीक जमिनी हिसकावून घेतल्यास आम्ही खायचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय असून असलेली शेतीच जर सरकारने काबीज केली तर जगणे मुश्कील होणार आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱयांच्या हिताचा विचार व्हायला हवा.
शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान-राजू मरवे
हलगा-मच्छे बायपास रस्त्यात येणाऱया शेतकऱयांच्या या पिकावू जमिनी आहेत. या जमिनीमध्ये वर्षातून दोन-तीन वेळा पिके घेतली जातात. प्रशासनाने शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान रचले आहे. रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढासुद्धा सुरू असताना न्यायालयाचा अवमान करून रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येत आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहोत.