कृषी समिती सभापतींची माहिती : 500 बायोगॅसचे होते उद्दिष्ट
प्रतिनिधी / ओरोस:
बायोगॅस सयंत्र उभारणीत जिल्हा परिषद कृषी विभागाने सन 2019-20 चे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती कृषी समिती सभापती तथा जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.
जि. प. कृषी समितीची मासिक सर्वसाधारण सभा बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्या सायली सावंत, सुधीर नकाशे, अमरसेन सावंत, प्रीतेश राऊळ आणि समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण उपस्थित होते.
बायोगॅस उद्दिष्टपूर्ती करणाऱया जिल्हय़ांना शासनाकडून दरवर्षी गुणानुक्रम दिला जातो. सन 2019-20 यावर्षी कृषी विभागाला 500 बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेल्या यादीत सिंधुदुर्गला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीबद्दल सभेत कृषी विभागाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त भागात फळपिकांची पुनर्लागवड करण्यासाठी शासनामार्फत विविध कलम रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱयांनी तालुका कृषी अधिकाऱयांमार्फत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन राजेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे.
भरपाईची माहिती दोन दिवसांत
सन 2019-20 मध्ये आंबा पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱयांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे. तसेच काजू पिकाच्या नुकसान भरपाईबाबतची माहिती दोन दिवसात विमा कंपनीकडून उपलब्ध होईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले. 39 महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंदे कार्यान्वित आहेत. तसेच शासनाने नव्याने मान्यता दिलेल्या 18 महसूल मंडळांमध्ये महसूलस्तरीय कार्यवाहीनंतर नवीन हवामान केंद्रे स्थापित केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, स्वयंचलित हवामान केंद्राच्या दिनांकनिहाय व महसूल मंडळनिहाय नोंदीचा अहवाल जानेवारी 2021 पासून प्रत्येक कृषी समिती सभेत देण्यात यावा. जेणेकरून हवामानाच्या होणाऱया नोंदीची विश्वासार्हता वाढेल, असे सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱयातील 40 गावांमध्ये मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱयाने मोठे नुकसान केले होते. याबाबतच्या नुकसानीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश सभापतेंकडून देण्यात आले. यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱया औजारांबाबत व आलेल्या प्रस्तावांबाबतची माहिती तसेच ‘मागेल त्याला शेततळी’ या योजनेंतर्गतच्या कार्यवाहीची माहिती पुढील सभेत सादर करावी, असे आदेश देण्यात आले.
शेतकऱयांची हानी
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून महामार्गालगत असलेल्या शेतकऱयांच्या शेतामध्ये मातीचा भराव जाऊन नुकसान झाले आहे. या शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी योग्य कार्यवाही करावी. तसेच जिल्हय़ात अनेक ठिकाणी नदीपात्रात गाळ साचलेला आहे. त्यामुळे नदीपात्र वाढत आहे. त्याला प्रतिबंध व्हावा, यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा करण्याचे आदेश सभापती म्हापसेकर यांनी दिले.