5 टनांची क्षमता असली, तरी फक्त 1 टन ओला कचरा उपलब्ध होत असल्याने अडथळा
प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डातील एसजीपीडीए किरकोळ मासळी बाजार येथील 5 टन क्षमतेच्या बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प?चे तीन आठवडय़ांपूर्वी उद्घाटन करून तो कार्यान्वित करण्यात आला असला, तरी 5 टनऐवजी एक टनच ओला कचरा उपलब्ध होत असल्याने तो पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झाला नसल्याचे दिसून येत आहे.
3 नोव्हेंबर रोजी पालिकेच्या तांत्रिक विभागाने या प्रकल्पाची प्राथमिक तपासणी करून हा प्रकल्प सुरू करण्यास हिरवी झेंडा दाखविला होता. या प्रकल्पात सध्या फळभाज्यांचा एक टन कचरा वापरून त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटमध्ये मांस आणि मासे यापासून तयार होणारा कचरा उघडय़ावरच फेकला जात असल्याचे दिसून येत आहे, तर काही कचरा, जो पालिकेचे कामगार उचलतात, तो सोनसडा येथे टाकला जात असल्याचे एका मासेविपेत्या महिलेने सांगितले.
दरम्यान, सध्या सदर प्रकल्पाचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. फळभाज्यांच्या कचऱयावर सध्या प्रकल्पात प्रक्रिया केली जात असली, तरी लवकरच टाकावू मासे व अन्य कचऱयावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मडगाव या व्यावसायिक राजधानीला कचरामुक्त करण्याच्या बाबतीत हा कचरा प्रकल्प हातभार लावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याशिवाय तो येथील कचऱयावर प्रक्रियेसाठी योग्य आहे की नाही हे कळणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी दिवसाला 5 टन कचरा या प्रकल्पाला पुरवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्याबाबतचे चित्र प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.