कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जात आहे आणि ‘बायो-बबल’चे संरक्षण त्यासाठी दिले गेले आहे. खेळाडू, पंच, पदाधिकारी, सहायक पथकातील सदस्य कोरोनापासून कित्येक कोस दूर असावेत, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे आणि याचवेळी काही दंडकही घालून दिले गेले आहेत. त्याचे पालन करणे क्रमप्राप्त असेल. त्याचा भंग केला तर मात्र कडक शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागू शकते.
बायो-बबल प्रणालीअंतर्गत यंदाच्या आयपीएल स्पर्धेशी संलग्न सर्व व्यक्तींची चाचणी घेतली जाते. बाहेरील व्यक्तींशी त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला जात नाही. अगदी कोरोना चाचणी घेणाऱया वैद्यकीय पथकातील सदस्यांनाही बाहेर जाण्याची परवानगी असत नाही.
यंदा 20 ऑगस्टपासून दुबईत खेळाडूंचे आगमन सुरु झाले. या सर्वांची प्रवासाआधी व प्रवासानंतर अशा दोन वेळा चाचणी झाली. दुबईतील नियमानुसार, पुढे ते 7 दिवस क्वारन्टाईन होते. या कालावधीत तीनवेळा चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये प्रवेश देण्यात आला.
या बायो-बबलमध्ये जितके लोक असतील, त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. विशेष परिस्थितीमुळे ज्यांना बाहेर जावे लागत असेल, त्यांना पुन्हा क्वारन्टाईन व्हावे लागते. या बायो-बबलचा भंग केल्यास शिक्षेची तरतूदही कडक आहे. जर एखादा खेळाडू या बायो-बबलच्या बाहेर गेला तर त्याच्यावर काही सामन्यांची बंदी लादली जाऊ शकते. सहभागी प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने तर आपल्या कोणी खेळाडूने बायो-बबलचा भंग केला तर करारही रद्द करण्याचा इशारा दिला आहे.