- सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच दुकाने सुरु
ऑनलाईन टीम / बारामती :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच बारामती शहरासह तालुक्यात वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दरम्यान खाजगी क्लास, आठवडी बाजार, धार्मिक राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात आले असून मेडिकल वगळता आता सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री सात पर्यंत सुरू राहतील.
पुढे ते म्हणाले, 23 मार्च ते पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. निष्कारण घराबाहेर फिरणाऱ्यांसह कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच हॉटेल चालकांना संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- हॉटस्पॉट मधील सर्व व्यवहार बंद
शहरातील सूर्यनगरी आणि गणेश मंडळाचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार दुकाने बंद राहणार आहेत. याची पूर्व कल्पना व्यापारांना देण्यात आली आहे तसेच विवाह सोहळ्यासाठी पन्नास आणि अंत्यसंस्कारासाठी वीस जणांना उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे नियम मोडणार यांवर कडक कारवाई केली जाईल.
दरम्यान, बारामतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 8,242 वर पोहोचली आहे. त्यातील 7,192 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत 152 जणांनी आपला जीव गमावला आहे.