प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा आज बुधवारी निकाल लागणार आहे. यावर्षी कोकण परीक्षा मंडळाच्या माध्यमातून परीक्षा दिलेल्या एकूण 29 हजार 864 विद्यार्थ्यांच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कोरोनाचे संकट कमी होताच राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच शाळास्तरावर घेतल्या. ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ ही संकल्पना या वेळेस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्य़ात 185 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्य़ातील एकूण 19 हजार 433 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. बारावीची परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान नियोजित वेळेनुसार घेण्यात आली होती. परीक्षेनंतर साऱयांना आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. पण आज 8 जून रोजी या परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी 1 वा. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत जाहीर होणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळेसही या परीक्षेत कोकण बोर्ड राज्यात अव्वल निकालाची परंपरा कायम ठेवणार का, याकडे लक्ष वेधले आहे.