ऑनलाईन टीम / मुंबई :
विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर 13 मार्चला रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाची माहिती दिली.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर 13 मार्चला होता. यावेळी विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचे वृत्त सोशल मीडियातून आज समोर आले. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, मी सांगू इच्छिते की, विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आगोदर प्रश्नपत्रिका दिली जाते. त्यानुसार रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका 10.20 वाजता वितरित करण्यात आली. मात्र, एका विद्यार्थिनीला येण्यास उशीर झाला होता. तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग तिच्या मोबाईलमध्ये 10.24 वाजता आढळून आला. या विद्यार्थिनीच्या चॅटनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याचीही चौकशी सुरु आहे. पण हा पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले.