अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 24 मे ते 16 जून या कालावधीत होणारी 12 वी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी मंगळवारी याविषयी माहिती दिली.
विधानसौध येथे शिक्षण खात्यातील अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून बारावीमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षेचे नवे वेळापत्रक परीक्षेपूर्वी 20 दिवस अगोदर घोषित करण्यात येईल, असे ते म्हणाले.
परीक्षेसाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलल्याने विचलित होऊ नये. श्रद्धेने आपला अभ्यास सुरू ठेवावा, असेही आवाहन सुरेशकुमार यांनी केले. कोरोनाचा धोका विचारात घेऊन अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला असला तरी बारावीचे वर्ग सुरू होताच ब्रिज कोर्स (सेतूबंध) सुरू करण्यात येईल. शिवाय शिक्षण खात्याच्या युटय़ूब चॅनेलवर आतापासूनच ब्रिज कोर्स सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यंदा 24 मे ते 16 जून या कालावधीत बारावी परीक्षा घेण्याचे नियोजन पदवीपूर्व शिक्षण विभागाने केले होते.
वर्क फ्रॉम होमची सूचना…
बारावी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याने विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत यासाठी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क, अभ्यासक्रम आणि अभ्यासपूरक कृतींविषयी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधवा, अशी सूचनाही प्राध्यापकांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.