20 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता : आज उच्च माध्यमिक शाळांसाठी ’वेबिनार’,निकाल मान्य नसणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षेचा पर्याय
प्रतिनिधी /पणजी
गोवा बोर्डाच्या रद्द करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाचे गुणांकन धोरण बोर्डाने जाहीर केले असून 20 जुलै रोजी निकाल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दहावी – बारावीचे गुण तसेच बारावीतील घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे गुण यांची सरासरी काढून गुण देण्यात येणार आहेत.
दरम्यान, आज शनिवार दि. 26 जून रोजी उत्तर गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांसाठी सकाळी 10.30 ते 11.30 व दक्षिण गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांसाठी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत या गुणांकन धोरणाचे वेबिनार सत्र गोवा बोर्डाने निश्चित केले आहे. हा निकाल मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पर्याय देण्यात येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
गोवा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (गोवा बोर्ड) अध्यक्ष भागिरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार या धोरणाचा मसुदा सर्व उच्च माध्यमिक शाळांना पाठवण्यात आला असून तो सर्व शिक्षकांनी प्राचार्यानी वाचावा आणि त्यानुसार निकाल द्यावा असे शाळा प्रमुखांना सूचवले आहे. दहावीचे 30 टक्के, अकरावीचे 30 टक्के व बारावी परीक्षेचे 40 टक्के असे मिळून एकूण 100 टक्के असा निकालाचा साचा (फॉर्म्युला) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार निकाल देण्यात येणार आहे.
हे धोरण किंवा साचातून मिळणारे गुण जर कोणाला पसंत नसतील किंवा कोणी समाधानी नसतील तर त्यांच्यासाठी परीक्षा घेण्याचा पर्याय बोर्डाने खुला ठेवला आहे. बारावी परीक्षेच्या निकालाची 20 जुलै ही अंदाजे तारीख असून ती मागे – पुढे होऊ शकते.
उच्च माध्यमिक शाळांसाठी आज वेबिनार
गोवा प्राचार्य मंचचे अध्यक्ष व वास्को सेंट ऍन्ड्रय़ू हायर सेंकडरीचे प्राचार्य ए. एस. काब्राल यांना वरील वेबिनार सत्राची लिंक गोवा बोर्डातर्फे पाठवण्यात येणार असून ती नंतर सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांना काब्रालतर्फे पुरवण्यात येणार असल्याची माहिती त्या शाळांना पाठवण्यात आलेल्या परिपत्रकातून देण्यात आली आहे. हे परिपत्रक शाळेतील नोटीस बोर्डावर लावण्यात यावे आणि सर्व संबंधितांना त्याची माहिती देण्यात यावी, असे त्या परिपत्रकातून कळविण्यात आले आहे. बोर्डाच्या सचिव जेराल्डिना मेंडिस यांनी ते जारी केले आहे. शाळांना पाठवण्यात आलेल्या गुणांकन धोरणाची मसुद्याची एकूण 30 पाने असून ती वाचून समजून घेण्यास शिक्षकांना, प्राचार्यांना काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्या धोरणानुसार उच्च माध्यमिक शाळा बारावीचा निकाल तयार करणार आहेत.