उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा सरकारला आदेश : रिपिटर्स विद्यार्थी उच्च न्यायालयात
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे परीक्षेविना बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला आक्षेप घेऊन रिपिटर्स विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने बारावी विद्यार्थ्यांच्या निकालाच्या प्रसिद्धीला गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. उत्तीर्ण करायचेच असेल तर रिपिटर्ससह सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा, असे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे.
नियमित विद्यार्थी आणि रिपिटर्स विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जात आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय उत्तीर्ण करावे किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. बारावी रिपिटर्स विद्यार्थ्यांच्यावतीने वकील सिंग्रेगौडा यांनी याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
उत्तीर्ण करायचेच असेल तर सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा. रेग्युलर विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण केले जात आहे. मात्र, रिपिटर्स विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जात आहे. राज्य सरकारची ही भूमिका योग्य नाही, अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच निकाल प्रसिद्धीला स्थगिती देत परीक्षेविषयी गुरुवारपर्यंत माहिती देण्याचा आदेश सरकारच्या ऍडव्होकेट जनरलना दिला.
कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शिक्षण खात्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा रद्द केली होती. दहावी आणि अकरावीतील गुणांच्या आधारे ग्रेडींगनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्याची घोषणाही केली होती. आता निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभही झाला आहे. मात्र, यापूर्वी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र, या विद्यार्थ्यांसाठी आगामी दिवसांत परीक्षा घेण्यात येईल, असे सरकारने सांगितले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप रिपिटर्स विद्यार्थ्यांनी केला होता. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने सरकारची भूमिका योग्य नसल्याचे स्पष्ट करत उत्तीर्ण करायचे असेल तर सर्वच विद्यार्थ्यांना करा, असे सूचविले आहे. तसेच गुरुवारपर्यंत सरकारने याविषयी स्पष्टीकरण द्यावे, असा आदेशही दिला आहे.
त्यामुळे सरकार रिपिटर्स विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याची घोषणा करेल का?, याविषयी गुरुवारी समजणार आहे.