शिक्षणतज्ञ प्रा. एम. आर. दोरेस्वामी यांचा राज्य सरकारला सल्ला
प्रतिनिधी / बेंगळूर
शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी बारावी परीक्षेसंबंधी घेतलेल्या भूमिकेचे शिक्षणतज्ञ आणि राज्य सरकारचे शैक्षणिक सल्लागार प्रा. एम. आर. दोरेस्वामी यांनी समर्थन केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पत्र पाठवून बारावी परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचा सल्ला दिला आहे.
विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी परीक्षेत मिळणारे गुण हेच निकष ठरणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागेल. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल, असा मुद्दा प्रा. दोरेस्वामी यांनी मांडला आहे.
मंत्री सुरेशकुमार यांनी परीक्षेसंदर्भात मांडलेल्या भूमिकेचे आपण समर्थन करीत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बारावीची परीक्षा घेणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनात ऐच्छिक विषयांप्रमाणेच भाषा विषयही महत्त्वाचे असल्याने भाषा विषयांची परीक्षा कोणत्याही कारणास्तव रद्द करू नये, असेही प्रा. दोरेस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष केंद्रीत करावे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर परीक्षा घ्याव्यात. परीक्षा केंद्रांवर सुरक्षा उपाययोजना कराव्यात. पदवीपूर्व महाविद्यालयांचेच परीक्षा केंद्रांमध्ये रुपांतर करावे. शक्य न झाल्यास ऑनलाईन परीक्षा घेऊन ऑनलाईनद्वारेच मूल्यमापन करता येईल, असे सल्लेही त्यांनी सरकारला दिले आहेत.