ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळाने दिली आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला होता.