कोकण बोर्डातील 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, – यंदाही मुलींची सरशी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत सलग 10 व्या वर्षी राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ-पुणेतर्फे घेण्यात येणाऱया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. कोकण विभागीय मंडळाने 99.81 टक्केवारासह यंदा सलग 10 वर्षीही राज्यात प्रथम क्रमांक कायम ठेवल्याची माहिती कोकण मंडळाचे विभागीय सचिव डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली. गतवर्षीच्या (95.89 टक्के) निकालात यावर्षी 3.92 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोकणात यंदाही मुलींनी 99.85 टक्केवारी प्राप्त करत बाजी मारली आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिह्याचा निकाल 99.92 तर सिंधुदुर्ग जिह्याचा 99.60 टक्के आहे. 2019 मध्ये कोकण विभागाच्या निकालात 1.62 टक्के घट झाली होती. 2020 मध्ये त्यात 2.66 टक्के वाढ होत कोकण विभागाचा निकाल 93.23 टक्के लागला होता. यावर्षी हा आलेख 3.92 टक्क्यांनी उंचावला आहे.
यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातून एकूण 27 हजार 384 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेसाठी 7 हजार 434 पैकी 7 हजार 389, कला शाखेतून 7 हजार 133 पैकी 7 हजार 130 विद्यार्थी, वाणिज्य शाखेमध्ये 11 हजार 413 पैकी 11 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रविष्ठ सर्वच्या सर्व 1 हजार 401 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ातून नोंदलेल्या 17 हजार 682 पैकी 17 हजार 682 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली व त्यामधून 17 हजार 668 विद्यार्थी (99.92 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिह्यातून नोदविलेल्या सर्व 9 हजार 702 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी 9हजार 664 विद्यार्थी (99.60 टक्के) उत्तीर्ण झाले.
रत्नागिरी जिह्यातून विज्ञान शाखेत 4 हजार 876 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 4 हजार 868 (99.83 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 4 हजार 896 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 4हजार 893 (99.93 टक्के) तर वाणिज्य शाखेत 7 हजार 379 प्रविष्ठ सर्व विद्यार्थी (100 टक्के) उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 528 प्रविष्ठ विद्यार्थी (100 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिह्यातून विज्ञान शाखेसाठी 2 हजार 558 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 521 (98.55 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून 2 हजार 237 विद्यार्थ्यांपैकी सर्व (100 टक्के) तर वाणिज्य शाखेत 4 हजार 34 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 33 (99.97 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमातून 873 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी (100 टक्के) यशस्वी झाले. पूनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये 567 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 559 विद्यार्थी (98.58 टक्के)उत्तीर्ण झाले.
निकाल अद्यापपर्यंत अव्वल
2012 साली कोल्हापूर केंद्रातून स्वतंत्र करण्यात आलेल्या कोकण विभागीय मंडळाचा 2015 सालचाच निकाल आतापर्यंत अव्वल होता. मात्र यावर्षी आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल झाला आहे. 2012 साली कोकण विभागाने 86.25 टक्के, 2013 साली 85.88 टक्के, 2014 साली 94.85 टक्के, 2015 साली 95.68 टक्के, 2016 साली 93.29 टक्के, 2017 साली 95.20 टक्के, तर 2018 साली 94.85 टक्के, 2019 मध्ये 93.23 टक्के आणि 2020 मध्ये 95.89 टक्के निकालासह राज्यात अव्वल टक्केवारी प्राप्त केली. 2021 मध्ये या 99.81 टक्के निकालासह नवी पातळी प्राप्त केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह त्यांचे शिक्षक, पालक यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे.
मुलांपेक्षा मुलींची सरशी
कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी कोकण विभागातून एकूण 13 हजार887 प्रविष्ठ मुलांपैकी 13 हजार 854 मुलगे (99.76 टक्के) तर 13 हजार 497 पैकी 13 हजार 478 मुली (99.85 टक्के) उत्तीर्ण झाल्या.
100 टक्के निकालाला गवसणी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा यावर्षीचा कोकण बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के व्यावसायिक शाखेचा निकाल 100 टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कला शाखेचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.