61 परीक्षा केंद्रांवर आजपासून परीक्षा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ातून एकूण 26,423 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीसारख्या प्रकारांवर परीक्षा काळात करडी नजर ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
भरारी पथकात शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील, प्राथमिक व माध्यमिक ,शिक्षणाधिकारी व डाएटचे प्राचार्य यांचा मुख्यत्वे समावेश आहे.
कोकण विभागीय मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे. कोकण बोर्डामार्फत बारावीच्या परीक्षेसाठी 61 परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ात 38 तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात 23 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही जिल्ह्य़ात 20 परिरक्षक केंद्रे या परीक्षेसाठी देण्यात आलेली आहे. त्यात रत्नागिरीत 12 तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 8 परिरक्षक केंद्राचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातून एकूण 17,379 विद्यार्थी बसणार आहेत. जिह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण केंद्र 38 तसेच परिरक्षक कार्यालय 12 आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून 9,044 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वसाधारण पेपरसाठी 3 तासच वेळ देण्यात येणार आहे.
सकाळच्या सत्रातील पेपर 11 वाजता आणि दुपारच्या सत्रातील पेपर 3 वाजता सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे जिह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर दक्षता समिती नेमण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या कक्षेत कोणीही येऊन नये याची दक्षता या समिती मार्फत घेण्यात येणार आहे. यंदा मंडळाच्या वतीने धोरणांतर्गत सकाळच्या सत्रात 11 वाजता परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना 10.30 वाजण्याच्या आत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच, दुपारच्या सत्रात 3 वाजता पेपर असल्याने विद्यार्थ्यांना 2.30 वाजण्याच्या आत परीक्षा केंद्रावर येणे गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकांचे वाटप सकाळसत्रात 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात 3 वाजता करण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम
परीक्षा केंद्राच्या परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, पॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.
परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस व वाहनास प्रवेशास मनाई राहील. सदर आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या बाबत लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. आदेशाचा भंग केल्यास भादंस कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.