प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 28 एप्रिलपासून सुरू होणाऱया बारावी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रयोग परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. एका पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
याबाबत बोलताना मंत्री सुरेशकुमार यांनी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 28 एप्रिलपासून सुरू होणारी बारावीच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रयोग परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच वार्षिक परीक्षा झाल्यानंतर तात्काळ प्रयोग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, पालक आणि अधिकाऱयांशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यास कटिबद्ध असून परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता वार्षिक परीक्षेची तयारी करावी, अशी सूचनाही मंत्री सुरेशकुमार यांनी केली आहे.