खोर्ली येथे घर कोसळले : सांगोल्डा, गिरी येथील शेती, रस्ते पाण्याखाली
प्रतिनिधी /म्हापसा
दोन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे बार्देशात झाडांची पडझड झाली तसेच बऱयाच ठिकाणी शेती व रस्ते पाण्याखाली गेल्याने या भागात नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खोर्ली म्हापसा येथील विशांत चंद्रकांत बागकर यांचे घर कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बार्देश तालुक्यातील सांगोल्डा साईमंदिर जवळील पूर्ण शेती तसेच ग्रीन पार्क समोरील परिसर, सरकारी शाळेसमोरील परिसर व पंचायतीजवळील सर्व शेती पाण्याखाली जाऊन या परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथील गावातील नागरिक तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाला दोष दिला आहे. ग्रीन पार्क जवळील रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली. चारचाकी गाडय़ांच्या सायलंन्सरमध्ये पाणी जाऊन अनेक गाडय़ा रस्त्यावरच बंद पडल्याचे पहावयास मिळाले.
याचप्रमाणे मार्ना शिवोली भागातील तसेच नादोडा, पीर्ण भागातील रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रेवोडा, नादोडा भागात जाण्याऱया नागरिकांना याचा बराच त्रास झाला. गिरी पंचायतीजवळ पाणी साचल्याने येथे ये जा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. तसेच अनेकांची वाहने अडकून पडली. ही वाहने दुरुस्ती करण्यासाठी मॅकानिकाला आणावे लागले.
खोर्ली म्हापसा येथे घर कोसळले
खोर्ली म्हापसा येथे रहाणाऱया विशांल चंद्रकांत बागकर यांचे घर कोसळून त्यांचे 1 लाखांचे नुकसान झाले. या विषयी माहिती देताना बागकर म्हणाले की, आपण सकाळी कामाला गेलो होतो. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घराची कौले खाली कोसळली. शौचालयाची भिंतही कोसळल्याने मोठे नुकसान झाले. यावेळी घरात लहान मुलगा होता. त्याच्यावर कौले पडल्याने तो किरकोळ जखमी झाला. यापूर्वी या घरावर पिंपळाचे झाड पडले होते. दरम्यान नगरसेविका तन्वी कोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
आमदाराच्या दुर्लक्षामुळे शेती पाण्याखाली : कोचरेकर
पावसाच्या पाण्याने शेतजमीन पाण्याखाली जात असल्याबाबत 2017 मध्ये आपण सरपंच असताना मंत्री जयेश साळगावकर व रोहन खंवटे याना निवेदन दिले होते. तसेच महामार्ग प्राधिकरणाने या भागात घातलेल्या दोन लहान पाईपची पाहणी करण्यासाठी या दोघांना बोलावले होते. मात्र ते आले नाहीत. हे काम योग्य झाले नसल्याने हा परिसर पाण्याखाली गेल्याची प्रतिक्रिया सांगोल्डा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रमानंद कोचरेकर यांनी व्यक्त केली.
तर गरीबांनी काय करावे : कासकर
आमचे गिरी येथील घर मोडल्याने आपण सांगोल्डा भागात दुकान घातले आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणाने एका बाजूने घर मोडल्याने सर्व पाणी घरात गेले. येथे आम्ही दरवर्षी शेती करतो. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेत पाण्याखाली जाऊन नासाडी झाली आहे. याला जबाबदार कोण आम्ही गरीबांनी काय करावे, अशी प्रतिक्रिया विष्णू कासकर यांनी व्यक्त केली.