प्रतिनिधी / बार्शी
बार्शीतील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती असलेली महात्मा फुले भाजी मंडई आपले जुने रूपाची कात टाकत आता नव्या रूपात भरण्यास सज्ज झाली आहे. गेली दहा महिने बार्शीतील सर्वात मोठी मध्यवर्ती महात्मा फुले भाजी मंडई कोरोना लॉकडाऊनमुळे बंद होती. महाराष्ट्र अनलॉक होत असताना महात्मा फुले भाजी मंडई चालू होणे हे अपेक्षित होते, मात्र अजूनही ती चालू होत नव्हती. यासाठी महात्मा फुले समता परिषद बार्शीच्या शाखेच्यावतीने भाजी मंडई चालू करण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने व निवेदने देऊन प्रशासनावरती तणाव निर्माण केला होता. परंतु महात्मा फुले भाजी मंडई ही विविध समस्यांच्या विळख्यात असल्याने त्या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे या सुविधा निर्माण करा व नंतरच भाजीमंडई चालू करा अशी मागणी लावून धरली होती. आता बार्शी नगरपरिषद प्रशासनाने भाजी मंडईतील विविध प्रकारच्या सुविधांच्या दुरुस्ती कामे प्रगतीपथावर चालू केलेली पाहायला मिळाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बार्शी तील सर्वात मोठी आणि जास्त व्यापारी संख्या असलेली महात्मा फुले भाजी मंडई कोरोनाचा विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून गेली दहा महिन्यापासून बंद होती. सर्व बाजारपेठ चालू झाली तरीही भाजी मंडई चालू होत नव्हती. तसेच सध्या असणाऱ्या या भाजीमंडईमध्ये विविध सुविधांचा खूप मोठा अभाव निर्माण झालेला होता या भाजीमंडईला असणारे वॉल कंपाऊंड अनेकवेळा प्रशासनाने फोडले असून मंडईची स्वागत कमान ही प्रशासनाने पाडली होती. त्याचबरोबर या भाजी मंडईमध्ये असणारे व्यापारी व शेतकरी यांना माल विक्रीसाठी बसण्यासाठी असणारे कट्टे यांची दुरावस्था झाली होती.
महात्मा फुले भाजी मंडई मधील गटार व्यवस्था ही पूर्णपणे निकामी झालेली होती, या मंडई मधील लाईट अनेक महिन्यापासून बंद असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचे वेळी या ठिकाणी मालाच्या चोर्या होत होत्या. पिण्यासाठी पाणी, व्यापारी, शेतकऱ्यांना माल धुण्यासाठी पाणी, शौचालय व मुताऱ्या अशा मूलभूत सुविधा सुद्धा या भाजी मंडईमध्ये उपलब्ध होत नव्हत्या. याविषयी अनेक व्यापाऱ्यांनी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विविध तक्रारी केल्या होत्या मात्र प्रशासन या भाजीमंडईकडे लक्ष देत नव्हते.
याविषयी महात्मा फुले समता परिषद शाखा बार्शीच्यावतीने आवाज उठविल्यानंतर बार्शी नगर परिषद मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी या भाजी मंडईची पाहणी करीत या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. सध्या भाजी मंडईतील सर्व व्यवस्था पूर्ववत झाली असून अनेक ठिकाणी वॉल कंपाऊंडच्या भिंती दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत, तसेच महात्मा फुले भाजी मंडईला रंगरंगोटी देऊन सजविण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या ठिकाणी असणाऱ्या गटारी दुरुस्त केल्या असून त्यांना योग्य उतार देऊन पाणी बाहेर काढण्याची सुविधा केलेली आहे आहे. व्यापारी शेतकरी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणारी शौचालय मुतारी यांची दुरुस्ती पूर्ण झालेली असून लवकरच त्या पूर्ववत चालू करण्यात येणार आहेत. या भाजी मंडई येथील व्यापारी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी आपला माल किंवा इतर साहित्य ठेवण्यासाठी असलेले छोटे गाळे यांच्या दरवाज्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून सर्व साफसफाई सुद्धा पूर्ण झाली आहे. अनेक वर्षापासून रखडलेली कामे व सुविधा पूर्ण होताना दिसत असताना येथील व्यापारी शेतकरी व नागरिकांच्या मनामध्ये समाधान निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.
व्यापारी शेतकऱ्यांना जागा आखून देणार
बार्शी शहरातील सर्वात जुनी आणि मोठी असलेली महात्मा फुले भाजी मंडई बाबत बार्शी नगर परिषद प्रशासनाने दुरुस्ती कामे पूर्ण केली असून काही कामे बाकी आहेत. तीही आठ दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. या वेळी येथे माळ विक्रीसाठी बसणारे शेतकरी, व्यापारी यांना सामाजिक आंतर राखून जागा आखून दिल्या जाणार असून जो नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्पष्ट केलं