प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायत निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत व या ग्रामपंचायतीचा चालू निवडणूक कार्यक्रमामध्ये समावेश करू नये, अशा आशयाचे पत्र बार्शी तहसीलला जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे आरक्षण योग्य रीतीने व नियमानुसार झाले नसून, ते सदोष असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे.
याबबत अधिक माहिती अशी, की नोव्हेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभानिहाय आरक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण मतदारांची संख्या तुलनेने जास्त असून देखील तो प्रभाग या निवडणुकीसाठी संपूर्ण आरक्षित झाला होता. यावर त्याच प्रभागातून गेल्या वेळी निवडून गेलेले माजी उपसरपंच बालाजी ताटे यांनी हरकत घेत या प्रभागात सर्वसाधारण जागेला न्याय मिळावा म्हणून राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे कागदपत्रांसह धाव घेतली होती.
या पार्श्वभूमीवर निर्णय होऊन 22 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने वरील विषयाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे बार्शी तहसीलला पत्र मिळाले आहे. पत्रात पानगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत, असे म्हटले असून यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्याकरिता स्वतंत्रपणे कार्यक्रम देण्यात येईल, असेही नमूद केले आहे.
प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आम्ही निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन रिव्हिजन दाखल केले होते. परंतु ते आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत म्हणून आम्हाला शेवटी राज्य निवडणूक आयुक्ताचे कार्यालय गाठावे लागले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाबद्दल आम्ही समाधानी आहोत. परंतु प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जदाराचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले जावे, ही अपेक्षा आहे. पण कोण ऐकत नाही ही खंत आहे. नागरिकांना राज्य निवडणूक आयोग अथवा उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नये याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी.
अॅड. विकास जाधव, हरकतदाराचे वकील
प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते चुकीचे आहे असे माझे मत तयार झाले होते. मी वारंवार जिल्हा प्रशासनाला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु याची दखल घेत नाहीत, हे लक्षात आल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. – माजी उपसरपंच बालाजी ताटे, हरकतदार