आपल्या पाल्याचे नाव शाळेत घातल्यानंतर बऱयाच पालकांची एकमेव इच्छा असते ती म्हणजे, त्याला मार्क जास्तीत जास्त पडावे, तो वर्गात पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये असावा. ज्युनिअर सिनिअर के.जी. मध्ये शाळेत नाव घातल्यावर पालकाना लगेच वाटू लागते की आपल्या पाल्याला लिहायला कधी येणार? खरे तर शिकण्याचा क्रम म्हणजे कोणतीही भाषा ऐकू येणे, शब्द संपदा वाढणे. किमान शंभर शब्द ऐकल्यानंतर पाल्य दहा-वीस शब्द बोलू लागेल. त्यानंतर त्या अजाण बालकाला चित्रे वाचायला शिकवली जातात.
चित्रांवरून त्याची नावे ओळखून ती नावे सांगता आल्यानंतर शब्द आणि शब्दानंतर वाक्ये बोलता येतील. अक्षरांची ओळख झाल्यानंतर वाचता येईल. बरेच काही वाचता आल्यानंतर दुसरी-तिसरीनंतर लिहिणे शिकवणे अपेक्षित आहे. शाळेतल्या मुलांनी उत्तरे देण्यापूर्वी असंख्य प्रश्न विचारायला शिकणे गरजेचे आहे. आकाशाचा रंग कोणता? असा प्रश्न विचारल्यानंतर ‘निळा’ असे एकमुखी उत्तर येणे अपेक्षित नाही. कोणी पांढरा असे उत्तर सांगेल, कोणी म्हणेल लाल, कोणी म्हणेल तांबूस. अशा विविध उत्तरांचे स्वागत व्हायला हवे. कोणी आकाशाचा रंग काळा असतो असे सांगितले तर त्यावर सूर्याचे प्रकाश किरण पावसाच्या ढगांनी अडवले असल्यामुळे ढग काळे दिसतात पण तसे ते काळे नसतात, हे शिकवायला हवे.
सर्वच मुलांनी एकसारखी उत्तरे द्यायला हवीत ही अपेक्षाच चुकीची आहे. “आमचा मुलगा म्हणजे मातीचा गोळा आहे, त्याला नीट शिकवा’’ असे सांगणारे पालक शिक्षकाना भेटले तर हा विचार चुकीचा आहे, हे शिक्षकांनी पालकाना सांगणे अपेक्षित आहे, कारण प्रत्येक बालकाला स्वतःचा मेंदू असतो, त्याप्रमाणे ते बालक स्वतंत्रपणे विचार करणारे असते हा विचार पालकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. मातीच्या गोळ्य़ामधून एकसारखी मडकी करणारी यंत्रणा शिक्षण क्षेत्रात उपयोगाची नाही, हेच मुळात पालकांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे शिक्षण म्हणजे काय आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग कसा असावा याबद्दल पालकांचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांनी मार्कासाठी शिक्षण घेतल्यास घोकंपट्टीचे तंत्र अवगत करावे लागते. पाठांतर केल्यास विषय समजत नाही पण पोपटपंची करता येते. पुढच्या इयत्ता वाढत जातात त्यावेळी पाठांतर केल्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन वेगवेगळ्या विषयांची आवड जोपासण्याचे निरंतर प्रयत्न शिक्षक आणि पालक दोघांनी करायला हवेत. इतिहास फक्त पुस्तकात आणि सनावळ्य़ामध्ये नसतो. आता दाखवल्या जाणाऱया टीव्हीवरच्या मालिकांमध्ये तर इतिहास नसतोच. ‘तानाजी’ सारखे तद्दन कमर्शियल भारतीय चित्रपट बघून इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण होतात.
‘भारत एक खोज’ सारख्या मालिका यु टय़ुबवर उपलब्ध आहेत, त्या सहकुटुंब बघायला हव्यात. त्यामध्ये भपकेबाज वातावरण टाळून त्याकाळात वापरले जाणारे कपडे, हत्यारे, राहणीमान अशा सर्व बाबींचा समग्र विचार केला आहे. तेव्हाचा काळ दृश्यात्मकरीत्या डोळ्य़ासमोर उभा राहिल्यानंतर त्यासंदर्भात पुस्तक वाचन विद्यार्थ्यांसह पालकांनीही करायला हवे. सहभोजन करताना आई-वडीलांचे लक्ष मोबाईलकडे असेल तर त्या घरातील मुलाना अभ्यासाची आवड लागणे दुरापास्त असते. ज्या घरात आई-वडील वृत्तपत्र-पुस्तके रोज वाचताना दिसतात, त्याच घरातील मुलाना रोज काही वाचण्याची सवय लागू शकते.
सायन्स म्हणजे शास्त्र या विषयाची गोडी लागण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनातील सायन्सचा शोध शिक्षक-पालकांनी घ्यायला हवा. अलीकडेच एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना एक बालक एका काचेवर दोऱयावरून सोडलेले पाणी बघून अचंबित झाला होता. त्यावर लाईट इफेक्ट असल्यामुळे ते पाणी एका सरळ रेषेत पडल्याचा भास होत होता. ते बघून त्याबद्दल तो काही प्रश्न विचारणार इतक्यात त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या हाताला हिसका देऊन वायफळ वेळ दवडल्याबद्दल झापले आणि एका टेबलजवळ एका खुर्चीवर गुमान रहायला सांगितले. आई-वडिलांनी दोघांनी आपापले मोबाईल काढले आणि त्यावर शोध सुरु केला ज्यामुळे बालक कंटाळला. त्यावर पुनश्च त्याला गप्प करण्यासाठी वडिलांनी त्याच्या हातात आयपॅड दिले त्यामुळे त्या बालकाचे प्रश्न संपले आणि तो गॅझेट विश्वात मग्न झाला. ‘कुटुंब रंगलंय मोबाईलमध्ये’ हा खेळ ऑर्डर केलेले जेवण येईपर्यंत सुरु होता. पालकांच्या अशा प्रवृत्तीमुळे ते पाणी दोरीवरून कसे पडू शकते वगैरे प्रश्नाना तिलांजली दिली गेली आणि प्रश्न न विचारणारा बालक समंजस ठरला.
सायन्स पुस्तकामध्ये असते असा भ्रम शिक्षण व्यवस्थेने करून दिल्यामुळे या विषयाबद्दल गोडी निर्माण होत नाही. त्यासाठी रोजच्या स्वयंपाकामध्ये मुलांना समाविष्ट करून घ्यायला हवे. गहू, कणिक, रवा, मैदा यांचा संबंध स्वयंपाकघरात चांगल्या पद्धतीने समजू शकतो. हळद कशी तयार होते, कांदा चिरताना डोळ्य़ात पाणी का येते?, त्यावर उपाय काय, तांदूळ आणि पोहे यांचा संबंध काय, मटकीला मोड आणण्यासाठी काय करावे लागते, घरात ताक नसताना दही कसे लावता येते, दह्यात बॅक्टेरिया कसे असतात, चांगले बॅक्टेरिया म्हणजे काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळत गेल्यानंतर जीवशास्त्र-रसायनशास्त्र आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे,
याचे प्रत्यंतर मुलाना आपोआप येते. शहरातल्या मुलाना पालकांनी गावातल्या शेतात घेऊन जाणे गरजेचे आहे. ऍग्री टुरिझमचा उपयोग आपली मुले पाचवीत असताना, आठवीत असताना आणि दहावीमध्ये असताना पालकांनी करून घ्यायला हवा. प्रत्येक ट्रीपला मुलांना नवनवे प्रश्न विचारण्यास उद्युक्त करायला हवे. जिज्ञासू वृत्तीचा अभाव असलेले विद्यार्थी सायन्समध्ये करियर कसे करू शकतील? नवीन वर्ष सुरु होताच अनेकजण नवे संकल्प सोडतात. 2022 या नव्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल पुढील लेखामध्ये.
-सुहास किर्लोस्कर