राजापूर-ओणी वात्सल्य मंदिरमधील मुलांची गगनभरारी
वार्ताहर /राजापूर
बालगृहातून वाढलेल्या मुलांनी प्राप्त परिस्थितीशी सामना करत कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना आपले जीवन यशस्वी केले. वेळप्रसंगी उपाशी राहून, सामान्य नोकरी करत शिक्षण घेत यशस्वी होण्याचा आदर्श निर्माण केलेल्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर संस्थेच्या 6 मुलांचा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून गौरव करण्यात आला. रत्नागिरी जिल्हय़ासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
शासनाकडून सत्कार झालेल्या ओणी बालकाश्रमातील या विद्यार्थ्यांपैकी विजय सराटे हे एम. एस. डब्ल्यू पदवीधर असून त्यांनी बालगृहातील मुलीशी विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गेली 15 वर्षे ते नालासोपारा येथे नारायण ट्रस्टतर्फे बालकाश्रम, वृध्दाश्रम व नोकरी करणाऱया स्त्राrयांसाठी वस्तीगृह चालवत आहेत. संजय सराटे बी.एससी. पदवीधर असून फिनोलेक्स कंपनीत काम करत आहेत. इंडोनिशिया येथे काही काळ त्यांनी काम केले. रत्नागिरीत पहिला सायबर कॅफे त्यांनीच सुरू केला.
महेशकुमार यांनी कृषी पदविका प्राप्त केल्यावर काही वर्ष संस्थेसाठी दिल्यावर शासकीय नोकरी करतच एम. ए. पदवी पूर्ण केली व कृषी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. गाँडफ्री फर्नांडीस यांना 10 वीला अपेक्षित यश मिळालेले नसतानाही जिद्दीने रसायन शास्त्रात पीएचडी केली. त्यांच्या नावावर 4 पेटंट आहेत. आजही त्याच संस्थेत मार्गदर्शक व शासकीय कंपनीचा सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच ते वात्सल्य मंदिर संस्थेचे कार्यकारिणी सभासद आहे.
अभय तेली बी.ए. शिक्षण पूर्ण करून पोलीस सेवत रूजू झाले. त्यानंतर स्वतःच्या जिद्दी व कष्टावर एफ वन फेर्समध्ये कमांडो म्हणून ते कार्यरत आहेत. अनाथ मुलांच्या समस्या निवारणासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. वैभव कोळेकर याने 10 वीनंतर सावर्डे कला महाविद्यालयात पदवी घेतली. त्या कालावधीत त्याने मुंबईतील जहांगीर आर्टमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळवले. चीनमध्ये मकाव बेटावर दीड वर्ष काम केले. देशातल्या विविध ठिकाणी ते आपला व्यवसाय करत आहेत. स्वतःबरोबर इतर 20-25 मुलांना त्यांनी रोजगार दिला आहे.
गेली 40 वर्षे वात्सल्य मंदिरची वाटचाल सुरू
वात्सल्य मंदिर संस्था गेले 40 वर्ष समाजातील अनाथ, निराधार तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱया मुलांसाठी बालकाश्रम चालवत आहे. आजपर्यंत 235 मुले शिक्षण पूर्ण करून संस्थेतून बाहेर पडली आहेत. त्यापैकी काही मुले पदवी शिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही मुले इंजिनिअरिंगमध्ये, काही मुलांनी खेळात राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. काही पोलीस, कमांडो, शिक्षक, वकील, मूर्तीकार, चित्रकार तर संस्थेतील एक विद्यार्थी रसायन शास्त्रात डॉक्टरेट पदवी घेऊन संशोधन करत आहेत.
संस्थेच्या मानात रोवला तुरा!
बालकाश्रमात राहून विशेष प्राविण्य मिळवलेल्या 32 विद्यार्थ्यांचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. शासनाच्यावतीने हा सन्मान म्हणजे संस्थेच्या मानात रोवलेला तुराच असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी व्यक्त केली.