ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थान सरकारने प्रदेशातील बालविवाह रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या नव्या आदेशानुसार आता लग्न पत्रिकेवर वर आणि वधूची जन्मतारीख छापणे अनिवार्य केले आहे. राज्यात होत असलेले बालविवाह थांबविण्यासाठी एक मेगा प्लॅन देखील तयार केला आहे.
राजस्थान सरकारने आदेश दिले आहेत की, लग्न पत्रिकेवर आता वर आणि वधूची जन्मतारीख लिहिली जाणार आहे. यासाठी वधू आणि वराची जन्म दाखल्याची प्रत प्रिंटिंग प्रेसला दिली जाणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशाचा विचार केल्यास कायद्यातील तरतुदी आणि बाल विवाह प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींची मोठ्या प्रमाणात जाहिरात करायची आहे. यासह सरकारी आदेशात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकांना हे सांगितले पाहिजे की, बालविवाह हा अपराध आहे. या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागृती करण्याची देखील आवश्यकता आहे.