बागलकोट येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार : 24 जानेवारीपासून बालविवाह विरोधी मोहीम राबविणार
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी ‘सुरक्षिणी’ हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी बागलकोट येथे प्रायोगिक तत्त्वावर ते सुरू केले जाईल. बागलकोटमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हा प्रयोग तेथे राबविला जाईल. याचबरोबरीने 24 जानेवारीपासून राज्यात बालविवाह विरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या पोर्टलवर बालविवाहाची माहिती कोणालाही देता येईल. शिवाय पुन्हा त्या पीडित मुलीचे लग्न केले जात नाही ना, याची चाचपणी केली जाईल. पीडितांना देण्यात येणारी सर्व सुविधा या पोर्टलवर पाहता येईल.
महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री हालाप्पा आचार यांच्या मते कोविडकाळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच बालविवाह विरोधी मोहीम राबविण्यात येणार असून ज्या भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे तेथे जनजागृती केली जाईल आणि बालविवाहामुळे मुलांच्या आरोग्यावर कसे परिणाम होतात, हे सांगण्यात येईल.
1978 तक्रारी दाखल
महिला व बालकल्याण खात्याकडे 2021 वर्षात 1978 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 1683 विवाह रोखण्यात खात्याला यश आले आहे तर 293 बालविवाहांचे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. म्हैसूरमध्ये 168 पैकी 145 बालविवाह रोखण्यात यश आले. बागलकोट व बळ्ळारीमध्ये 146 घटनांची नोंद झाली असून अनुक्रमे 96 व 134 बालविवाह रोखण्यात आले आहेत.
बागलकोटमध्ये 41 बालविवाह झाले असून त्यापैकी 29 प्रकरणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये फक्त 169 तक्रारी दाखल झाल्या असून काही कालावधीनंतर तक्रार मागेही घेण्यात आली आहे. महिला व बालकल्याण खात्याने बालविवाह प्रकरणी एफआयआर दाखल करून आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे, अशी सूचना हालाप्पा आचार यांनी केली आहे.