प्रतिनिधी / सातारा :
अल्पवयीन गुन्हेगारांना साताऱ्यातील बालसुधारगृहात ठेवण्यात येते. परंतु बालसुधारगृहात त्यांची कोण जबाबदारी घेणारे आहे का? असे अनेक प्रश्न पोक्सो गुह्यातील आरोपी मृत सुरज शिंदे याच्या आत्महत्येमुळे निर्माण झाले आहेत. यामुळे बालसुधारगृहातील मुलांच्या सुरक्षितेला प्राधान्य देण्यास आता कोणती पावले उचलण्यात येणार आहेत की, बालसुधारगृहाच्या अधीक्षक संजीवनी राठोड पुन्हा अशा घटना घडण्याची वाट पाहणार आहेत.
18 वर्षाआतील मुले संशयित असल्यास त्यांना बालसुधारगृहात ठेवले जाते. त्यांच्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. परंतु ही मुले या बालसुधारगृहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षात येथून मुले पळून जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे मुलांच्या मनात कारागृहात नसताना कारागृहात असल्याची भावना निर्माण होत आहे. मुलांच्या मनावर निर्माण होणारे दडपण आणि गुन्हेगारीचा ठपका मुलांना टोकाचे पाऊल उचलायला भाग पडत आहे. हे नुकताच आत्महत्या केलेल्या मृत सुरज शिंदेच्या प्रकरणावरून समोर येत आहे.
बालसुधारगृहात मृत सुरजला आणून फक्त चार दिवस झाले होते. या चार दिवसांत त्यांची मानसिकता इतकी बिघडली की त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे बालसुधारगृहातील इतर मुलांच्या मानसिक आरोग्याशी हेळसांड सुरू आहे का? एक अल्पवयीन आत्महत्या करेपर्यंत सुरक्षारक्षक, कर्मचारी, अधीक्षक कुठे होते. त्यांना चार दिवसांत त्यांच्या वागण्यातील बदल जाणवला नाही का? असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. परंतु जे जे ऍक्टनुसार माहिती देण्यास अधीक्षक संजीवनी राठोड यांनी नकार दिला आहे. वारंवार माहिती देण्यास टाळटाळ करणाऱया अधीक्षक यांना बालसुधारगृहात राहणे बंधनकारक आहे. परंतु बालसुधारगृहात राहण्याची व्यवस्थित सोय नसल्याने त्या राहत नाहीत. यामुळे सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने अधीक्षक राहत नसतील तर मुलांना अपुऱ्या सोयीसुविधांमध्ये राहणे भाग पडत असल्याचे चित्र समोर येत आहे.
हातावर संशयितांची नावे आणि….
मृत सुरज शिंदे याने युवती आणि इतर नातेवाईकांची नावे हातावर लिहून आत्महत्या केली. या संशयितांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात ऋतिक धरम शिंदे यांने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. यामुळे खोटय़ा गुन्हात अडकवल्याचे मानसिक दडपण आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बालसुधारगृहाचाच कारभार सुधारण्याची गरज
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात दाखल केले जाते. तेथे त्याचे प्रबोधन केले जाते तसेच तो ज्या मार्गाला लागला आहे, त्यापासून त्याला मागे येण्यास प्रवृत्त केले जाते. पण सातारच्या बालसुधारगृहात नक्की काय चाललंय हे पाहण्याची वेळ आली आहे. येथील कारभारच सुधारण्याची गरज वाटू लागली आहे.