दिग्गज मंत्र्याला वकील अन् डॉक्टरकडून आव्हान
बालीगंज मतदारसंघ कोलकात्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे. येथे सातव्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात सलग दोनवेळा विजयी झालेले तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री सुब्रत मुखर्जी पुन्हा मैदानात उतरले आहेत. राज्यात 2011 मधील सत्तांतरापासूनच सुब्रत हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. पंचायत आणि ग्रामीण विकास यासारख्या महत्त्वपूर्ण विभागाची जबादारी त्यांच्याकडे दीर्घकाळापासून आहे.
राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सुब्रत यांना ममता बॅनर्जी देखील स्वतःचे राजकीय गुरू मानतात. पण यंदा मुखर्जी यांना भाजप आणि माकपकडून चुरशीचे आव्हान मिळत आहे. भाजपच्या वतीने वकील लोकनाथ चटर्जी मैदानात उतरले आहेत. तर माकप उमेदवार डॉक्टर फुवाद हलीम देखील संयुक्त मोर्चाच्या वतीने विजयाचा दावा करत आहेत. हलीम यांचे वडिल हाशिम अब्दुल हमीम हे माकप शासकाळात सलग 29 वर्षांपर्यंत (1982-2011) बंगाल विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.
15 वर्षांपासून तृणमूलचा कब्जा
या मतदारसंघात मागील 15 वर्षे म्हणजेच 2006 पासून तृणमूलचा कब्जा आहे. 2016 मध्ये मुखर्जी सलग दुसऱयांदा येथून आमदार झाले होते. त्यांनी काग्रेसच्या कृष्णा देवनाथ यांना 15,225 मतांनी पराभूत केले होते. तर भाजप तिसऱया स्थानावर राहिला होता. 2011 च्या निवडणुकीत मुखर्जी यांना माकप उमेदवार फुवाद हलीम यांच्यावर मात केली होती.
1971-2001 पर्यंत माकपचे वर्चस्व
या मतदारसंघात पहिल्यांदा 1957 मध्ये मतदान झाले होते. ज्यात माकप उमेदवाराला विजय मिळाला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये येथे माकपचेच वर्चस्व राहिले होते. 1971 ते 2001 पर्यंत माकपचा या मतदारसंघावर कब्जा राहिला होता.
हिंदीभाषिक निर्णायक
या विधानसभा मतदारसंघात सुमारे 20 टक्के मतदार हिंदीभाषिक आहेत. तर मोठय़ा संख्येत मुस्लीम मतदारही आहेत. विजय-पराजय निश्चित करण्यात यांची महत्त्वाची भूमिका आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे चांगली कामगिरी केली होती आणि माकपला मागे सारून दुसऱया स्थानावर उडी घेतली होती. यंदा विजयासाठी भाजपने येथे पूर्ण जोर लावला आहे.