आपण लहान असल्यापासून कितीवेळा, ‘ए असं नको बोलूस, त्याचा/तिच्या बाल मनावर परिणाम होईल,’ हे वाक्य एखादे विनोदी प्रत्युत्तर म्हणून किंवा थट्टा म्हणून ऐकले आहे? आपण हे वाक्य शक्यतो अशा व्यक्तीसाठी वापरतो जी व्यक्ती एखाद्या गटात इतरांपेक्षा भोळी, निरागस आणि भावनिकदृष्टय़ा थोडी नाजूक आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल, की हे तर फक्त एक साधे वाक्य आहे, त्याबद्दल काय बोलणार? पण त्याच वाक्याला आज एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे.
जन्माला आलेल्या क्षणापासून माणसाचा मेंदू हा प्रत्येक लहान तपशील शोधून घेण्यास सुरुवात करतो, कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी! जसजसे ते अनुभव आणि शिकवणी मेंदूच्या विशि÷ वाहिन्यांमध्ये प्रवेश करतात, तसतसे मेंदू ते अनुभव एका ठिकाणी सुरक्षितपणे साठवून ठेवू लागतो. मग, त्या साठवलेल्या अनुभवांचे रूपांतर हे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवायला सुरुवात करते. अनुभवाप्रमाणे स्वतःची वेगळी मते, आवडीनिवडी, या सगळय़ा गोष्टी आकार घेऊ लागतात आणि त्याचे त्या माणसाची ओळख घडवणाऱया वैशिष्टय़ामध्ये रूपांतर होते. पण येथे समस्या अशी आहे की हे सर्व एखाद्या बंद दुर्गम ठिकाणी घडत असल्याने ते माणसाला कधीच दिसत नाही. या सगळय़ाचा केवळ दृश्यमान परिणाम म्हणजे माणसाचे वर्तन, व्यक्तिमत्त्व आणि कृती.
या तिन्ही गोष्टी समाजात तेव्हाच स्वीकारल्या जातात जेव्हा त्या समाजाने आखलेल्या चूक आणि बरोबरच्या पेटीमध्ये बसतात. एखादा माणूस जर ठरलेली वाट सोडून वागत असेल, तर त्याला चूक म्हणून बाजूला केले जाते. माणूस हा स्वतःच्या जातीला एक शत्रू म्हणून पाहू लागतो. माणसाची ठेवण ही परिपूर्ण नसून सदोष आहे हे विसरतो. यामध्ये बरेचदा आपल्याला हे लक्षात येत नाही की नकळत, आपल्या भूतकाळात अनुभवलेल्या गोष्टींचा ‘डोमिनो इफेक्ट’चा हा परिणाम असतो. जेव्हा एक प्रसंग घडतो आणि अशाच घटनांची साखळी रचू लागतो, त्याला ‘डोमिनो इफेक्ट’ असे म्हणतात. तसेच, माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या डोमिनो इफेक्टचा परिणाम आहे. ज्या माणसाला बालपणापासून आईवडील वा परिवाराचा सहवास मिळतो, योग्य संस्कार, शिक्षण आणि आहार मिळतो, तो माणूस मोठा होऊन शारीरिक आणि भावनिकरित्या एक संतुलित व्यक्तिमत्त्व बनतो.
तसेच, लहानपणी पुरेसा सहवास, आश्वासन, आधार, संस्कार आणि आहार नाही मिळाला तर त्याचा माणसाच्या प्रौढ जीवनात नकारात्मक प्रभाव पडू शकतो. खरंतर माणूस त्याच्या आयुष्यात दोनदा जन्म घेतो. एकदा, जेव्हा तो या जगात पदार्पण करतो आणि एकदा जेव्हा तारुण्यात पदार्पण करतो. म्हणून तारुण्यातील प्रवास हा बऱयाच जणांसाठी खडतर असतो. या वेळेला ते अनुभव आता अनेक स्वतंत्र आणि ठोस मतांमध्ये विकसित होत असतात. हे संक्रमण एखाद्या माणसाला कोणत्या पातळीवर पोचवेल किंवा खराब करू शकेल याचा आपण अंदाज बांधू शकणार नाही. म्हणूनच माणसाच्या बालपणात त्याच्यासाठी सुखद, मौल्यवान आणि चांगले अनुभव निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलाचे मन हे एका कोऱया पाटीसारखे असते. जी आपले कुतूहल घेऊन ठिकठिकाणी माहिती गोळा करत फिरत असते. अशावेळेल्या बालपणात आपण कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात येतो हेही महत्त्वाचे असते. इथे, काही माणसं आपल्या आयुष्यात एका चिलखताचे काम करतात, आपले रक्षण करून आपल्याला आश्वासन देतात. काही माणसं सूचनाफलकाचे काम करून हरवल्यावर योग्य मार्ग दाखवतात. असे प्रत्येक प्रकारचे लोक जीवनाच्या वेग वेगळय़ा टप्प्यात आपल्याला भेटतात आणि मनावर एक खूण करून जातात. पण, काही माणसं ही काटय़ांसारखी असतात. आपल्याला टोचून बोलतात, त्रास देतात आणि वेदना देतात. या अनुभवांची खूण मनामध्ये जास्ती खोलपर्यंत जाऊन रुतते!
मग, सगळय़ात मोठा प्रश्न उद्भवतो. हे सर्व टाळले जाऊ शकते का? त्या काटय़ांपासून कोणाची कधी सुटका झाली आहे का? नाही, कोणीच या कटू अनुभवांना अपवाद नाही आणि तसे होऊपण नये. जीवनात कोणी कितीही नशीबवान असला तरी कधी ना कधी त्याला या काटय़ांना सामोरे जावे लागते. या काटय़ांना आपण टाळू शकलो नाही तरीही त्यामुळे झालेल्या वेदनांना नक्कीच मलम लावू शकतो. अशावेळेला आपल्या आजूबाजूच्या माणसांचा सहवास हा माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतो. पण आपण त्या डॉमिनो इफेक्टचा मूळ विसरून माणसाच्या वर्तनावरून त्याचे मोल ठरवतो आणि त्याला समजून न घेता त्याच्याबद्दल कित्येक मते मनामध्ये निर्माण करतो. त्या डोमिनो इफेक्टला कोसळण्यापासून थांबवले तर ते त्या माणसावर आणि इतरांवर जास्त प्रभावी ठरेल.
लहानपणापासूनच मुलांना या काटय़ांशी लढा द्यायला शिकवले गेले पाहिजे. काही मुले लवकर शिकतील तर काहींना थोडा वेळ लागेल. अशावेळेला जी मुले इतरांपेक्षा भोळी आणि भावनिकदृष्टय़ा कमकुवत आहेत त्यांना मानसिक आधार देऊन त्यांच्याशी सहानुभूतीने वागले पाहिजे.
अशाने त्या मुलाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि हळूहळू तो स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला शिकू लागेल. पालकांनी आपल्या मुलाच्या बालपणात या सर्व गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे फक्त शाळेत मिळत नाही तर त्याची सुरुवात घरापासूनच होते. लहान मुलाचा पहिला शिक्षक त्याचा पालक असतो. हे जाणून त्याची योग्य ती जबाबदारी घेणे ही काळाची गरज आहे. एखाद्या शिल्पकारासारखे प्रत्येक पालकांनी आपल्या मुला मुलींचे व्यक्तिमत्त्व काळजीपूर्वक आणि संयमाने घडवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच पुढच्या वेळेला कोणी मजेत जर ते वाक्मय म्हणाले तर त्यांना एकच गोष्ट सांगा की, ‘बालमनावर परिणाम होऊ देऊ नका, बालमन जपा.’
श्राव्या माधव कुलकर्णी