मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. जनआशीर्वाद यात्रेवेळी राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला अभिवादन केले होते. यांनतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांवर हल्लाबोल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण करण्यापेक्षा मन शुद्ध ठेवा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी “मी कोणासमोर नतमस्तक व्हावं, कोणाला नमस्कार करावा हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला ते पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा ना? काय दूषित झालं होतं?”
यावेळी राणे यांनी, “मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं योग्य मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?” असे ते म्हणाले.
दरम्यान, २२ राज्यांमध्ये भाजप कडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात समावेश असलेले मंत्री या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत.