ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, थोरात आज दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. आता काँग्रेस हायकमांड बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता अशी दोन पद आहेत. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्येही ते महसूल मंत्री आहेत. यातून महाराष्ट्रतील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान याआधीही अशाच चर्चांमुळे बाळसाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी दिल्लीच जाऊन तसे कळवले देखली होते. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या मुंबईत दौऱ्यातही थोरात यांनी त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मानसिकता बोलून दाखवली होती.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि काँग्रेसने याला पाठिंबा द्यावा यात बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती. परंतु प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणीमुळे थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे ठरवले असे सांगितले जात आहे.