सहा प्रभागांतील गटारे उपसली, फातर्पाकडील रस्त्याच्या बाजूचे गटार उपसल्याने लोकांकडून समाधान
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
बाळळी पंचायतीने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली असून कोरोनामुळे सुरुवातीला जनता कर्फ्यू लागू झाला व नंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू केलेला लॉकडाऊन चालू आहे. पण पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने पंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्यास प्राधान्य दिले आहे.
पंचायतीने या मोहिमेला वॉर्ड क्र. 2 पासून सुरुवात केली व आतापर्यंत 6 प्रभागांतील गटारे उपसण्यात आली आहेत. याकामी आम्ही स्वतः देखरेख ठेवत आहोत. ही कामे टाळता येत नाहीत आणि ती पावसाळय़ापूर्वीच झाली पाहिजेत. म्हणून ही कामे आधीच हाती घेतली आहेत, असे सरपंच राजेश फळदेसाई, उपसरपंच प्रतिमा नाईक व पंच राजू गोसावी, संजना वेळीप यांनी सांगितले. लॉकडाऊन असल्याने बहुतांश कामगार कामाविना आहेत. काही निघण्याच्या तयारीत आहेत. हीच संधी साधून या कामगारांना पंचायतीने काम दिले. एरव्ही वाहनांची तसेच लोकांची वर्दळ व वाहन पार्किंगमुळे काम हाती घेणे अडचणीचे ठरत होते, असे यावेळी सांगण्यात आले.
मागील काही वर्षे बाळळी ते फातर्पा रस्त्याच्या बाजूचे गटार उपसण्याचे राहून गेले होते. त्यामुळे पावसाळय़ात लोकांना ये-जा करणे कठीण होण्याइतके पाणी रस्त्यावरून जायचे. आता गटार उपसण्याचे काम चालल्याने लोकांनी पंचायतीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. याठिकाणी तर एक मीटर खोल इतका गाळ साचला होता. याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूचे गटार साफ करण्याचे काम झाले पाहिजे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने यंदाही लोकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपण एकंदर परिस्थिती केपेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दाखवून बऱयाचदा लक्ष वेधलेले आहे, असे पंच गोसावी यांनी सांगितले. मात्र काहीच फरक पडला नसल्याबद्दल त्यांनी चीड व्यक्त केली.
साकवाची रूंदी वाढवावी
निदान चार रस्त्याच्या मध्यभागी असलेला साकवाच्या खालील गटार तरी उपसावे व साकवाची रूंदी वाढवावी, अशी मागणी या भागाचे पंच गोसावी यांनी केली आहे. सध्या लोकांची रहदारी नाही. लॉकडाऊनची संधी साधून साकवाचे काम करता येणे शक्य आहे. तसेच बाळ्ळीहून केपेकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूच्या गटाराच्या कठडय़ाचे काम लवकर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या ठिकाणी गटाराला कठडा नसल्याने वरचेवर अपघात होत आहेत. केपे येथून आलेली वाहने कुंकळळी, काणकोणच्या दिशेने वळविणे त्यामुळे धोक्याचे होते याकडे गोसावी यांनी लक्ष वेधले आहे.