अध्याय नववा
अवधूत म्हणाले, राजा योग्याने मन एकाग्र करण्यासाठी घरगृहस्थीचा आरंभ न करता एकटेच राहणे योग्य आहे. कारण घरदाराचा आरंभ केला की, मुलाबाळांच्या, स्त्रीच्या मायाममतेचे पाश त्याच्याभोवती आवळले जातात. कुटुंबीयांबद्दलचे कर्तव्य पार पाडले की, बदल्यात त्यांच्याकडून इच्छा अपेक्षा बाळगल्या जातात. त्या पूर्ण झाल्या तर आनंद होतो. नाही झाल्या तर दुःख होते. हे सर्व आसक्तीतून निर्माण होते आणि योग्याने तर आसक्तीरहित असावे. योग्यासाठी आवश्यक असलेले हे लक्षण सर्पामध्ये दृष्टीस पडल्यावरून सर्पाला मी गुरु केले. सर्पाला कोणाचीच सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखाने फिरत असतो. तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छ्?वासही व्यर्थ दवडत नाही. योग्यानेही तसेच करावे. दुसऱयाचा उपसर्ग होऊ देऊ नये, लोकांच्या दृष्टीस न पडेल अशा ठिकाणी एकांतात एकटेच रहावे. वाईटाची संगत धरू नये तसेच चांगल्याचीही संगत करू नये. कारण चांगल्या वाईट दोन्हीही संगतीतून आजूबाजूच्या लोकांशी संपर्क येतो. त्यांच्याशी संबंधित निरनिराळे विचार मनात येऊ लागतात आणि ते एकाग्रता साधण्यासाठी बाधक ठरतात. म्हणून योग्याने सर्पाने कात टाकल्याप्रमाणे देहाची साथ सोडून बाहेर पडावे. बुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून एक क्षणही फुकट जाऊ देऊ नये. आपले स्वरूपानुसंधान कधीही तुटू देऊ नये. सर्प आपणहून बिळामध्ये शिरतो. तो ज्या वाटेने गेलेला असतो त्याच्या खुणा मार्गावरचे सारे लोक पाहतात पण तो तेथून गेला आहे एवढेच त्यांना कळते. तो भुकेलेला आहे की तृप्त झालेला आहे, हे काही त्यांना कळत नसते! एकूणच सर्पाचे वागणे तसे अनाकलनीय असते. त्याप्रमाणे योगीही योगसामर्थ्याने लोकांच्या संसर्गात न राहता गुहेमध्येच राहतो आणि एकटाच आपापल्याशी क्रीडत असतो. योगी वागत असता त्याचा आचार लहानथोर सारे पाहतात, पण तो खरोखर सविकल्प आहे की निर्विकल्प आहे, हे कोणासच काही कळत नाही. कोणी म्हणतात तो कर्मठ आहे, कोणी म्हणतात तो कर्मभ्रष्ट आहे. कोणी म्हणतात, तो आत्मनि÷ आहे. पण स्पष्ट असे कोणासच त्याचे काहीच कळत नाही. सर्पाला बोलता येत नाही. तो काही थोडासा शब्द मात्र करतो. त्याप्रमाणेच योगीही वादविवादामध्ये वा जास्त बोलण्याच्या फंदात कधी पडत नाही. बोललाच तर अंतःकरणातील कृपेच्या बळाने थोडेसे पण मृदु, मंजुळ आणि कोमळ असेच बोलतो. त्यामुळे त्याचे भाषण एक वेळ ऐकले तरी कान अगदी तृप्त होऊन जातात. कारण त्याचे थोडे बोलणे मनातील शंका कुशंका नष्ट करून सोडते. त्याच्या उपदेशाचे स्वरूप जे कोणी सत्यसंकल्पी असतात त्यांनाच कळते. योगी एकटा व उदासीन असतो. त्याचे मन परमार्थाकडेच लागून राहिलेले असते म्हणून तो घरदार करण्याच्या फंदात पडून व्यर्थ यातायात करत नाही.
पुढे अवधूत म्हणाले, घर करणे हेच मुळी दुःखास कारण आहे. कारण, जिवापाड कष्ट सोसून तीन मजली वाडा बांधावयाचा, पण तो सर्वथैव अशाश्वत असतो. जेथे सर्व संसार नाशवंत आहे, देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे तेथे घरच तेवढे शाश्वत कसे असेल? पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात. अशा गृहाचा आरंभसुद्धा खोटाच असतो, तो मातीसाठी तंटा लावतो. दगडासाठी किंवा लाकडासाठी आप्तसंबंध बाजूस ठेवून भांडण करवितो! वाळवी मोठय़ा प्रयत्नाने वारुळ तयार करते आणि काही एक कष्ट न करता त्यात सर्प जाऊन खुशाल राहतो. त्याचप्रमाणे योगीसुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगत नाही. निरभिमानाने दुसऱयाच्या घरात राहून सदासर्वदा आनंदात असतो. म्हणून राजा, कुठेही घर करायचे नाही, हाच निश्चय मी केला. मग देवाने केलेल्या सृष्टीपासून मला कशी बाधा होत नाही असा प्रश्न तुला पडेल. त्याचे उत्तर मला माझे पुढील गुरु कोळी यांच्याकडून मिळाले. कोळी मनात आले की जाळे तयार करतो आणि त्यात न गुंतता, मनात आले की ते नष्ट करून टाकतो. अवधुतानी याबद्दल दिलेली माहिती आपण पुढील भागात पाहू.