ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात 22.6 किलो वजनाची चांदीची वीट ठेऊन मंदिराचा पाया रचला जाणार आहे. राममंदिर ट्रस्टकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमीपूजनासाठी देशातल्या पवित्र नद्यांचे पाणीही आणले जाणार आहे. भूमिपूजन पार पडल्यावर लगेचच मंदिराचा 22.6 किलो चांदीची वीट ठेवून पाया रचण्यात येईल. या चांदीच्या वीटेवर जय श्रीराम आणि मोदींचे नाव टाकण्यात आले आहे. भूमिपूजनच्या दिवशी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींना रत्नजडीत पोशाख घातला जाणार आहे.
भूमिपूजनाला 10 प्रसिद्ध उद्योगपतींनाही निमंत्रण
राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी 300 जणांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये देशातील 10 उद्योगपतींचाही समावेश आहे. 50 साधू-संत, 50 अधिकारी, विश्व हिंदू परिषदचे 50 लोक, न्यासाशी संबंधित काहीजण आणि देशातील 50 नेत्यांचाही समावेश असेल. भूमिपूजनाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांच्यासह अन्य तिघांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.