रणकुंडये ग्रामस्थांची मागणी : गावात हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात
वार्ताहर /किणये
बेळगाव शहरापासून अवघ्या 13 कि. मी. अंतरावर असणाऱया रणकुंडये गावात मंगळवारी रात्री दंगल झाली. एका मंदिराच्या उभारणीवरून हा वाद झाला, असे चित्र आणि व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाले. मात्र वास्तव काही वेगळेच आहे. रणकुंडये गावातील हिंदू-मुस्लीम लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात, वागतात. याला बाहेरच्या लोकांनी वेगळे स्वरुप दिलेले आहे, असे समस्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रणकुंडये गावात धार्मिकस्थळाच्या नासधुशीवरून तणाव निर्माण झाला. याबद्दल बेळगाव परिसरातील काही समाजकंटक गावात दाखल झाले आणि त्यांनीच गावात भांडणाची प्रवृत्ती जागृत केली, असे मत गावकऱयांनी व्यक्त केले.
रणकुंडये गावातील प्रत्येक मंदिरांची नव्याने उभारणी करण्याचे ग्रामस्थ व पंच मंडळींनी ठरविले होते. त्याप्रमाणे गावातील लक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेले हुवाचे देव इथे मंदिर बांधण्याचे काम करण्यात येत होते. मंगळवारी रात्री बेळगावमधून काही गुंड प्रवृत्तीचे लोक आले आणि ही जागा आमची आहे, अशी भाषा करू लागले. त्यानंतर गावकरी व त्या बाहेरच्या लोकांमध्ये संवाद-बाचाबाची झाली आणि मारामारीही झाली, असे गावकरी सांगतात. रणकुंडये गावात हिंदू-मुस्लीम हा वादच नाही. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून सगळे मिळून-मिसळून राहतो, वागतो हेच सारेजण सांगत होते.
येथे हिंदू-मुस्लीम असे भांडणच नाही, असे प्रत्येकजण सांगतो आहे. मग गावात भांडण पेटविण्यासाठी कोण आले? त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बुधवारी सकाळी गावात तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावात कडक पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.
गावात एकी राहावी, एकात्मता टिकून राहावी या उद्देशाने हिंदू व मुस्लीम समाजाच्या प्रमुख पंचांनी बैठक घेतली. या बैठकीत किणये ग्रा. पं. च्या पीडीओ यांना बोलाविण्यात आले. सदर जागा ही सार्वजनिक आहे, असे पीडीओ यांनी सांगितले. त्यानंतर गावातल्या त्या मंदिराची उभारणी करण्यातआली.
बैठकीला ग्रामीण पोलीस प्रशासनासह ग्रा. पं. सदस्य भरमाणी पाटील, नूरसाब ताशिलदार, परशराम कोलकार, मुरारी पाटील, निंगाप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील, राणू पाटील, बाबाजान सय्यद आदी उपस्थित होते.