मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाउन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर राज ठाकरे यांनी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यात कोरोना पसरत आहे कारण बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या राज्यात कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत असे म्हणत ठाकरे सरकारची पाठराखन केली.
राज ठाकरे म्हणाले की, काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या लॉकडाउनबाबत भेटीची विनंती केली होती, त्यांचा फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोव्हिड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलंत आहे. त्यामुळे झूमवर बोलण्याचं ठरलं. आम्ही दोघंच असल्यामुळे आमच्यात काय बोलणं झालं, हे सांगण्यासाठी मी आज भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, हे महाराष्ट्रातच का दिसतंय?महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र त्याचं एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील. लॉकडाउनमध्ये जे कामगार परत गेले त्यावेळी मी मागणी केली होती, जे लोक परत येतील त्यांची मोजणी करा आणि चाचणी करा. पण त्यांची मोजणी झालीच नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरं काही असेल, हे दुष्टचक्र न थांबणारं असल्याचे ते म्हणाले.
तसेच माझ्याकडे अनेक तक्रारी आणि सूचना आल्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या असल्याचे देखील राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.