सुखकर्ता, दुःखहर्ता गणरायाच्या उत्सवाचा आज सातवा दिवस. गणेशभक्तांवर सर्वदूर संकटांची मालिकाच उभी ठाकली आहे. गेले वर्ष-दीड वर्ष गणेशभक्तांवर एका पाठोपाठ एक विघ्ने कोसळत आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोना व्हायरस नावाचे महासंकट धुमाकूळ घालत असून यावर्षीचा गणेशोत्सवदेखील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधामध्ये साजरा करावा लागतो आहे.
कोरोना व्हायरसचा प्रभाव कधीकधी कमी तर कधी जास्त आढळत असतानाच नेमकी गणेशोत्सवाच्या काळात तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक ठरते. गोव्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व भाविकांना कोरोना विषयक सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन कार्यक्रम पत्रिकेद्वारे केले आहे. कोरोना आपली नाना रूपे रोज दाखवित आहे. डेल्टा व्हायरस, निपाह व्हायरस, म्युकर मायकॉसिस अशा व्हायरसच्या अनेक प्रजातींनी सर्वसामान्यांना घाबरवून सोडले आहे. लसीकरण मोठय़ाप्रमाणात सुरू आहे, मात्र तरीही साथ आटोक्यात येताना दिसत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चला टाळेबंदी लागू झाल्यापासून गोव्यात सुरू असलेली संकटांची मालिका आजही संपलेली नाही. कोरोनामुळे एकीकडे आसू अन् दुसरीकडे हसू अशी अवस्था गोमंतकीयांची बनली आहे. अशा अवस्थेत गोमंतकीय आज गणेशोत्सव साजरा करीत आहेत. दहा दिवस, अनंत चतुर्दशी व 21 दिवशीय साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांतच काही गणेशोत्सव मंडळांनी आटोपता घेतला आहे. घरगुती गणेशोत्सवही बहुतांश दीड दिवसांतच साजरा झालेला आहे. कोरोना महामारीमुळे गणेश उत्सवावर खऱया अर्थाने विरजण पडले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे भव्यदिव्य कार्यक्रम व होणारा गजबजाट यालाही गोमंतकीयांना मुकावे लागले आहे. गोमंतकीयांचा पिंड मुळात कलाकाराचा. गोव्यात प्रत्येक वाडय़ा-वाडय़ावर भजनी पथके मोठय़ा प्रमाणात आहेत. महिला भजनी पथकांचीही संख्या लक्षणीय आहे. ही भजने पहाटेपर्यंत रंगायची परंतु आता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बहुतांश घरमालक स्वतःच भजने, आरती करून समाधान मानून घेत आहेत. त्यामुळे खऱया अर्थाने कलाकार व रसिकांचा विरस झालेला आहे. चतुर्थी म्हटली म्हणजे मुख्य खाद्य करंज्या. या करंज्या बनविण्यासाठी ‘एकमेकां साहय़ करू’ या धर्तीवर अनेक महिला एकमेकांच्या घरी जाऊन करंज्या बनवायच्या, मात्र यंदा हे चित्र दुर्मीळ आहे.
गणेशोत्सव म्हणजे भटजीबुवांचा थाट वेगळाच असतो. कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या वर्षी भटजीबुवांनी ऑनलाईनपद्धतीने म्हणा किंवा व्हिडिओ, ऑडियोच्या माध्यमातून, पुस्तकाद्वारे गणेश पूजनाचा मान सांभाळला होता. यंदा कोरोनाचा असर कमी झाल्याने काही भटजींनी घरोघरी जाऊन गणेश पूजन करण्याचा निर्णय घेतला.
गोवा राज्यात दीड दिवशीय ते 21 दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायचा, मात्र यंदाही या परंपरेत खंड पडला आहे. माशेल, कुंभारजुवे येथील 21 दिवशीय वैशिष्टय़पूर्ण, कलात्मक गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेशभक्तांची पावले त्याठिकाणी वळायची. मात्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा अजून पूर्णतः शून्यावर आलेला नसल्याने तसेच कोविडच्या तिसऱया लाटेपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी चतुर्थीनिमित्त माशेल, कुंभारजुवे भागात बनविण्यात येत असलेले गणेश देखावे यंदाही बनविण्यात येणार नाहीत. कलाकारांनी यंदा गणेश चतुर्थी आपल्या घरीच अत्यंत साध्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरविले आहे.
केवळ कोरोना हे एकच विघ्न नाही. अन्य नैसर्गिक आपत्तीही या गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण टाकत आहेत. पाऊस आणि वादळाने यावर्षी दाणादाण उडवली. तौक्ते चक्रीवादळानेही मोठे नुकसान झाले. या संकटातून जरा कुठे सावरत असतानाच गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसानेही थैमान घातले. शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरीराजाच्या हाती काही पडणे अशक्य दिसत आहे. राज्य सरकारने उत्तर गोव्यातील पूरग्रस्तांना सुमारे 1.90 कोटीचा निधी मंजूर केला असून ती आर्थिक मदत पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सदर अर्थसाहाय्य मंजुरीचा आदेश जारी केला आहे.
महागाईचे आणखीन एक संकट कोसळले आहे. गेले काही महिने पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकासाठी वापरावयाच्या गॅसच्या किंमती रोज वाढत आहेत. गोरगरीबांच्या घरची चूल पेटवणारे रॉकेल तर अनेक ठिकाणी मिळत नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच घटकांवर परिणाम होतो आणि अंतिमतः महागाई वाढते. महागाईच्या या वरवंटय़ात सर्वसामान्य नागरिक भरडून निघत आहे.
गोव्याची मदार केवळ पर्यटन व खाण व्यवसायावरच अवलंबून. मात्र सध्याला हे व्यवसाय संकटात सापडले आहेत. हे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करूया तसेच गोमंतकीयांच्या आरोग्याच्या प्रश्नीही साकडे घालुया. अमलीपदार्थ व्यसनात गोमंतकीय युवक गुरफटला आहे. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी गणराया त्यांना सुबुद्धी देओ.
विघ्नांची मालिका उभी असतानाच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झालेले आहे. बाप्पावर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे कितीही विघ्ने आली तरी ऋण काढून सण साजरा करण्याच्या रिवाजानुसार यावर्षीही गणेशोत्सव भक्त उत्साहाने साजरा करत आहेत. तो भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. मात्र आनंद उत्सव साजरा करत असतानाच संकटाची जाणीव ठेवली पाहिजे. सरकारने घातलेले निर्बंध लक्षात घेऊन वागले पाहिजे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सण साजरा करावयाचा आहे. राज्यात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गणेशोत्सवात ऐरणीवर आलेला आहे. ऑनलाईन शिक्षणपद्धतीकडे जाताना सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. विघ्नहर्त्याचे पूजन करणारे गोमंतकीय सध्या आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या विघ्नांच्या मालिका सरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही संकटांची मालिका कधी संपेल, हे आगामी काळात पाहावे लागणार आहे. आज आम्ही विद्यमान स्थितीत समस्त गोमंतकीय गणेशभक्त श्रीकडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, गोवा राज्यावर तसेच समस्त देश, जगभरात आलेले कोरोना विघ्न तसेच अन्य समस्या दूर कर महाराजा, सगळय़ांचे आरोग्य चांगले ठेव रे।़।़ महाराजा.’
राजेश परब